आयसीसचं भारतातील नेटवर्क उद्ध्वस्त, NIA च्या विशेष न्यायालयाकडून 15 जणांना शिक्षा

| Updated on: Oct 17, 2020 | 6:05 PM

भारतात आयसीसच्या शाखा सुरु करुन युवकांना दहशतवादाच्या मार्गावर नेण्याचं कारस्थान केल्याप्रकरणी दिल्लीतील विशेष न्यायालयाने आज (17 ऑक्टोबर) एक मोठा निर्णय दिला.

आयसीसचं भारतातील नेटवर्क उद्ध्वस्त, NIA च्या विशेष न्यायालयाकडून 15 जणांना शिक्षा
Follow us on

नवी दिल्ली : भारतात आयसीसच्या शाखा सुरु करुन युवकांना दहशतवादाच्या मार्गावर नेण्याचं कारस्थान केल्याप्रकरणी दिल्लीतील विशेष न्यायालयाने आज (17 ऑक्टोबर) एक मोठा निर्णय दिला. भारतात आयसीसचं (ISIS) नेटवर्क उभं करण्याचा गंभीर आरोप असलेल्या 15 जणांना न्यायालयाने दोषी मानलं आहे. या प्रकरणी या सर्वांना 10 वर्ष, 7 वर्ष आणि 5 वर्ष अशा वेगवेगळ्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय संबंधित दोषींना आर्थिक दंड भरण्याचीही शिक्षा ठोठावली आहे (NIA special court punish 15 people for spreading ISIS network in India).

दोषी सर्व 15 आरोपींवर भारतात दहशतवादी संघटना आयसीसीचं नेटवर्क उभं करण्याचा आरोप होता. त्यांनी भारतात आयसीसचं नेटवर्क उभं करत दहशतवादी कृत्य करण्यासाठी सोशल मीडियावर मुस्लीम युवकांची दिशाभूल केल्याचं तपासात स्पष्ट झालंय. विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रविण सिंह यांनी या प्रकरणातील मुख्य दोषी नफीस खानला 10 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. त्याशिवाय इतर तिघांना प्रत्येकी 7 वर्षांची शिक्षा सुनावली. या कामात मदत करणाऱ्या अन्य एका दोषीला न्यायालयाने 6 वर्षांची शिक्षा सुनावली. तुरुंगवासासोबतच या दोषींना आर्थिक दंडाचीही शिक्षा मिळाली आहे. एनआयए विशेष न्यायालयाने (NIA Specail Court) दोषींना 30 हजार रुपयांपासून 1 लाख 30 हजार रुपयांपर्यंत दंड भरण्याची शिक्षा सुनावली.

2015 मध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल

एनआयएच्या एका उच्च अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी 2015 मध्ये वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. काही लोक दहशतवादी संघटना आयसीसच्या इशाऱ्यावरुन भारतात त्यांच्यासाठी सहयोगी संघटना उभ्या करत असल्याचा आरोप होता. या संघटनेचं नाव जुनेद-उल-खलिफा ठेवण्यात आलं होतं. या संघटनेचे प्रमुख भारतातील युवकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून चिथावणी देऊन दिशाभूल करत होते. यानंतर या युवकांना दहशतवादी संघटनेत भरती करण्याचा डाव होता.

एकूण 19 जणांना अटक

गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या या कारवाईत एनआयएने एकूण 19 जणांना अटक केली होती. या संघटनेचा भारतातील प्रमुख आयसीसचा प्रमुख मानला जाणाऱ्या यूसुफ अल हिंदी उर्फ अरमान उर्फ अनजान भाई यांच्या इशाऱ्यावर काम करत होता. हा व्यक्ती आयसीसचा सोशल मीडिया प्रमुख असल्याचं सांगितलं जातं.

आयसीसमध्ये भरती होण्यास निघालेल्या अनेक युवकांना अटक

एनआयएच्या अधिकाऱ्याने सांगितलं, “या लोकांना अटक केल्यामुळे आयसीसमध्ये भरती होण्यासाठी निघालेल्या अनेक युवकांची माहिती मिळाली. त्या युवकांना पकडून भारतात परत आणण्यात यश आलं आहे.”

या प्रकरणी दोषीचे वकील कौसर खान म्हणाले, “न्यायालयाने 8 दोषींना 5 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. अबु अनस, मुफ्ती अब्दुल समी कासमी आणि मुदब्बिर मुश्ताक शेख यांना 7 वर्षांची, तर अमजद खानला 6 वर्षांची शिक्षा सुनावली. अब्दुल्ला खान, नजमुल हुदा, मोहम्मद अफजल, सुहैल अहमद, मोहम्मद अलीम, मोइनुद्दीन खान, आसिफ अली आणि सैय्यद मुजाहिद यांना 5 वर्षांची शिक्षा झाली आहे.

संबंधित बातम्या :

दिल्लीत पकडलेल्या संशयित अतिरेक्याच्या घरात स्फोटकांचा मोठा साठा, वडिलांसह तिघांना अटक

‘आयसिस’लाही कोरोनाची धास्ती, युरोप दहशतवाद्यांच्या टार्गेटवरुन दूर

आयसिसचे पाच दहशतवादी भारतात घुसले, देशभरात हायअलर्ट!

संबंधित व्हिडीओ :

NIA special court punish 15 people for spreading ISIS network in India