इतिहास बदलण्याचा प्रयत्न करू नये, महागाईचा मुद्दा बाजूला अन् केवळ हिंदू-मुस्लीमवर चर्चा, भुजबळांचे वर्मावर बोट

| Updated on: Nov 17, 2021 | 1:05 PM

कंगनाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. कंगणाविरोधात कलम १५३ (अ) कायद्या अंतर्गत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार नाशिक पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे.

इतिहास बदलण्याचा प्रयत्न करू नये, महागाईचा मुद्दा बाजूला अन् केवळ हिंदू-मुस्लीमवर चर्चा, भुजबळांचे वर्मावर बोट
छगन भुजबळ
Follow us on

मुंबईः कित्येकांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले. नेहरूंचेही योगदान आहे. त्यामुळे इतिहास बदलण्याचा कोणी प्रयत्न करू नये. कंगनाच्या वक्तव्याची नोंद घेण्याचीच गरज नाही, असे खणखणीत उत्तर बुधवारी मंत्री छगन भुजबळ यांनी दिले. ते मुंबईत बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त बोलत होते. यावेळी भुजबळांनी भाजपचाही समाचार घेतला. कंगना राणावतने ‘१९४७ चे स्वातंत्र्य भीक मागून मिळाले होते, खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले,’ असे वक्तव्य केल्याने गेल्या कित्येक दिवसांपासून वाद निर्माण झाला आहे. कंगनाचे अभिनेते विक्रम गोखले यांनी समर्थन केले. मात्र, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने कंगनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

कंगनाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. कंगणाविरोधात कलम १५३ (अ) कायद्या अंतर्गत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नाशिक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे आणि त्यांच्या शिष्टमंडळाने पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांची भेट घेऊन केली. यावेळी त्यांना सर्व पुरावेही दिले आहेत. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्लास्टिकच्या घोड्यावर बसून झाशीची राणी सिनेमा करणाऱ्या कंगनाला पद्मश्री पुरस्कार देणे हा अखंड हिंदुस्थानचा अपमान असल्याची जहरी टीका केली होती. त्यानंतर आज बुधवारी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमात मंत्री छगन भुजबळ आक्रमक झाले. त्यांनी कंगनासह भाजपलाही इशारा दिला.

भाजपकडून पोळी भाजणे सुरू

मंत्री छगन भुजबळ म्हणाले, बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू. कंगना राणावत आणि विक्रम गोखले यांची नोंद घेण्याची गरज नाही. आपल्या देशात कित्येकांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले. नेहरुंचे ही योगदान आहे. कंगना आणि गोखलेंच्या वक्तव्यावर समाज माध्यमातून देखील टीका झाली. इतिहास बदलण्याचा प्रयत्न कोणी करू नये, अशा इशारा यावेळी भुजबळांनी दिला. हिंदुत्वाचा वाद निर्माण करायचा आणि आपली पोळी भाजण्याचा हा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न आहे. महागाई आणि इतर सर्व मुद्दे बाजूला पडले आहेत आणि हिंदू-मुस्लिम विषय चर्चिला जातो आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू. कंगना राणावत आणि विक्रम गोखले यांची नोंद घेण्याची गरज नाही. आपल्या देशात कित्येकांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले. नेहरुंचे ही योगदान आहे. कंगना आणि गोखलेंच्या वक्तव्यावर समाज माध्यमातून देखील टीका झाली. इतिहास बदलण्याचा प्रयत्न कोणी करू नये.
– छगन भुजबळ, मंत्री

इतर बातम्याः

बाळासाहेबांचं हिंदुत्व राष्ट्रीयत्वाला धरून, भागवतही म्हणालेले आमचा DNA एक, खासदार सावंतांकडून उजाळा

Nashik|पैल्या धारंच्या प्रेमानं साला…हळदीत गाणं वाजलं अन् लग्नाआधीच नवरदेवाची पोलिसांनी काढली वरात!