कोरोना लस येताच प्रत्येक भारतीयापर्यंत जलद गतीने पोहोचवण्याची तयारी : नरेंद्र मोदी

| Updated on: Oct 20, 2020 | 6:40 PM

कोरोनाची लस जेव्हा येईल तेव्हा ती लवकरात लवकर प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारची जलदगतीने तयारी सुरु असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

कोरोना लस येताच प्रत्येक भारतीयापर्यंत जलद गतीने पोहोचवण्याची तयारी : नरेंद्र मोदी
Follow us on

नवी दिल्ली : गेल्या आठ महिन्यांच्या काळात भारताने कोरोनावर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवलं आहे. मात्र पूर्ण नियंत्रण मिळेपर्यंत लढाई कमकुवत होऊ देऊ नका, असं सांगत कोरोनाची लस जेव्हा येईल तेव्हा ती लवकरात लवकर प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारची जलदगतीने तयारी सुरु असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. (Pm Narendra Modi on Corona vaccine)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांशी संवाद साधला. यावेळी देशातून लॉकडाऊन गेला असला तरी व्हायरस गेलेला नाही. त्यामुळे अजूनही सतर्कता बाळगा, असं आवाहन त्यांनी केलं.

‘जब तक दवाई नही, तब तक ढिलाई नही’, असं सांगत जोपर्यंत कोरोनाची लस येत नाही तोपर्यंत कोणतीही हयगय करू नका. कोरोनाच्या लशीवर युद्धपातळीवर संशोधन सुरू असून लवकरच ही सर्वांना मिळेल असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दिला.

“सध्या सणासुदीचे दिवस आहेत. त्यामुळे अनेक लोक घराबाहेर पडताना दिसत आहे. पण घराबाहेर पडताना काळजी घ्या. आपण लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली आहे. पण याचा अर्थ देशातून कोरोनाचं संकट गेलं असं होत नाही. कोरोनाचं संकट कायम आहे. कोरोना गेला अशी समजूत करण्याची किंवा कोरोनापासून धोका नाही, असं मानण्याची ही वेळ नाही. अनेकांनी सावधानता बाळगणं बंद केल्याचे व्हिडीओ मी पाहिले, बेपर्वा वर्तनामुळे स्वतःच्याच कुटुंबाला संकटात टाकू नका”, असं आवाहन मोदींनी केलं.

“आपल्याकडे 90 लाखापेक्षा जास्त बेड उपलब्ध आहेत. तसंच 12 हजार क्वारंटाईन सेंटर आहेत. 2 हजार लॅब टेस्टिंगचं काम सुरु आहे तर देशातील चाचण्यांची संख्या लवकर दहा कोटींच्या वर जाईल”, असंही मोदींनी यावेळी सांगितलं.

“अनेक युरोपीय देशांमध्ये कोरोनाची आकडेवारी कमी होता-होता चिंताजनक पद्धतीने वाढली. त्या तुलनेत जगातील विकसित देशांपेक्षा जास्त नागरिकांना वाचवण्यात भारताला यश आले. भारतात प्रतिदशलक्ष लोकसंख्येमागे मृत्यूदर 83 आहे तर अमेरिका, ब्राझिल, ब्रिटनसारख्या देशात 600 पार मृत्यूदर गेलाय”, असं सांगायला देखील मोदी विसरले नाहीत. (Pm Narendra Modi on Corona vaccine)

संबंधित बातम्या

कोरोनाचं संकट कायम, जब तक दवाई नही, तब तक ढिलाई नही : पंतप्रधान मोदी