Kargil Vijay Diwas : भारताने मैत्रीचा हात पुढे केला, पण पाकिस्तानने पाठीत खंजीर खुपसला : पंतप्रधान मोदी

| Updated on: Jul 26, 2020 | 12:08 PM

"भारताने पाकिस्तानसोबत मैत्री करण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला. मात्र, पाकिस्तानने पाठीत खंजीर खुपसला", असा घणाघात पंतप्रधान मोदींनी केला (PM Narendra Modi on Kargil Vijay Diwas).

Kargil Vijay Diwas : भारताने मैत्रीचा हात पुढे केला, पण पाकिस्तानने पाठीत खंजीर खुपसला : पंतप्रधान मोदी
Follow us on

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (26 जुलै) रेडियो वर ‘मन की बात’ कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधला (PM Narendra Modi on Kargil Vijay Diwas). विशेष म्हणजे आज (26 जुलै) कारगील विजय दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’ कार्यक्रमात कारगील युद्धात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांनी पाकिस्तानवर सडकून टीका केली. “भारताने पाकिस्तानसोबत अनेकवेळा मैत्री करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाकिस्तानने पाठीत खंजीर खुपसला”, असा घणाघात पंतप्रधान मोदींनी केला (PM Narendra Modi on Kargil Vijay Diwas).

नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?

आज 26 जुलै आहे. आज खूप महत्त्वाचा दिवस आहे. आज कारगील विजय दिवस आहे. 21 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी भारतीय सेनेने विजयाचा झेंडा फडकवला होता. कारगील युद्ध ज्या परिस्थित झालं, ते भारत कधीच विसरु शकणार नाही. पाकिस्तानने अंतर्गत प्रश्नांपासून जनतेचं लक्ष्य दूसरीकडे वळवण्यासाठी हे कृत्य केलं होतं.

भारताने पाकिस्तानसोबत चांगल्या संबंधांचा बराच प्रयत्न केला. पण ‘बयरु अकारण सब काहू सों, जो कर हित अनहित ताहू सों’ म्हणजेच दृष्ट लोकांचा स्वभावच असतो की, प्रत्येकाशी विनाकारणं शत्रूत्व करावं. अशा लोकांचा चांगल्या हिताचा विचार केला तरी ते समोरच्याचे नुकसान करण्याचाच प्रयत्न करतात. त्यामुळे पाकिस्तानने भारताच्या पाठित खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर भारताच्या वीर सेनेने जी ताकद दाखवली त्याला संपूर्ण जगाने पाहिलं.

उंच पर्वतांवर शत्रू आणि पायथ्याशी उत्तर देणारी भारतीय सेना. पण विजय हा उंच पर्वतांचा नाही तर भारतीय सेनेच्या धैर्य आणि पराक्रमाचा झाला. त्यावेळी मलाही कारगीलच्या जवानांची भेटीगाठी घेण्याची संधी मिळाली. ते दिवस माझ्या आयुष्यातील अत्यंत अनमोल क्षण आहेत.

देशभरातील नागरिक आज कारगील विजय दिन साजरा करत आहेत. सोशल मीडियावर नागरिक आपल्यावरांना वंदन करत आहेत. शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. मी शहिद जवानांसह, त्या मातांनाही वंदन करतो ज्यांनी भारतमातेच्या या खऱ्या वीर पुत्रांना जन्म दिला.

देशातील जवानांशी माझी विनंती आहे की, आज कारगील विजय दिनाबाबत लोकांपर्यंत माहिती पोहोचवा. वीर मातांच्या त्यागाची माहिती एकमेकांना सांगा. मी आग्रह करतो, www.gallantrywards.gov या वेबसाईटला भेट द्या. तिथे तु्म्हाला वीर, पराक्रमी योद्ध्यांच्या पराक्रमाबाबत भरपूर माहिती मिळेल. ही माहिती इतरांना सांगितलं तर त्यांनाही प्रेरणा मिळेल.

कारगील विजय दिनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी लाल किल्ल्यावरुन जे सांगितलं होतं, ते आजही आपल्या सगळ्यांसाठी खूप प्रासंगिक आहे. अटलजींनी देशाला गांधीजींच्या मंत्राची आठवण करुन दिली होती.

जर कुणाला काय करावं आणि काय न करावं, असं वाटत असेल तर त्याने भारतातील सर्वात गरिब आणि असहाय व्यक्तीबबत विचार करायला हवा. त्याने विचार करायला हवा की, तो जे करत आहे त्याने गरिब व्यक्तीचा फायदा होईल की नाही? असा गांधीजींचा मंत्र होता.

अटलजी म्हणाले होते की, कारगील युद्धाने एक मंत्र दिला, कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याअगोदर आपण विचार करायला हवा की, आपला हा निर्णय त्या सैनिकाच्या सन्मानासारखा आहे का, ज्याने देशासाठी प्राणाची आहुती दिली.

युद्धजन्य परिस्थितीत आपण जे बोलतो त्याचा सीमेवर कर्तव्यदक्ष असलेल्या सैनिकांच्या कुटुंबियांवर गंभीर परिणाम पडतो. ही बात कधी विसरायला नको.

सोशल मीडियावर काही वेळा अशा गोष्टींचा प्रचार केला जातो ज्यांचा देशाला मोठं नुकसान होतं. काही वेळा ठावूक असूनही उत्सुकता म्हणून चुकीचा मेसेच व्हायरल केले जातात.