पुढच्या वेळी मोदी-नितीश कुमार आले तर त्यांना पकौडे खायला घाला, राहुल गांधींचा निशाणा

| Updated on: Oct 28, 2020 | 5:04 PM

पंतप्रधान मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा तुमच्याकडे आले की त्यांनी पकौडे खायला घाला, असा टोला काँग्रेस नेते राहुल गांधींनी प्रचारसभेदरम्यान लगावला.

पुढच्या वेळी मोदी-नितीश कुमार आले तर त्यांना पकौडे खायला घाला, राहुल गांधींचा निशाणा
Follow us on

पाटणा : तरुणाईला पकौडे बनवण्याचा आणि ते विकण्याचा सल्ला देणाऱ्या पंतप्रधान मोदी यांच्या याच मुद्द्याची आठवण काँग्रेस नेते राहुल गांधी यांना प्रचारसभेत उपस्थित व्यक्तीने करुन दिली. त्यावर पंतप्रधान मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा तुमच्याकडे आले की त्यांनी पकौडे खायला घाला, असा टोला राहुल गांधींनी लगावला. (Rahul Gandhi taunt pm Modi And Nitish Kumar)

बिहार विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रचार कार्यक्रमात आज (बुधवार) पंतप्रधान मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी आमनेसामने आहेत. पंतप्रधान मोदींची दरभंगा, मुजफ्फरपूर आणि पाटन्यात रॅली होतीये. तर राहुल गांधीच्या वाल्मिकीनगर आणि कुशेश्वर इथं दोन रॅली पार पडत आहेत.

राहुल गांधी यांनी पश्चिमी चंपारणमध्ये सभा घेऊन महागठबंधनला प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचं आवाहन केलं. याच दरम्यान त्यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना जोरदार टोले लगावले.

आमच्यामध्ये एक कमी आहे ती म्हणजे खोटं बोलण्यात आम्ही भाजपचा सामना करु शकत नाही, असं राहुल गांधी म्हणाले. याचवेळी सभेला उपस्थित असणाऱ्या एका व्यक्तीने राहुल गांधी यांना मोदींच्या पकौडे तळण्याच्या मुद्द्याची आठवण करुन दिली. त्यावर पुढच्या वेळी मोदी-नितीश कुमार आले की त्यांना पकौडे खायला घाला, असं राहुल म्हणाले.

राहुल गांधी यांनी याच सभेत बोलताना रोजगार आणि शेतकरी हिताच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारला जोरदार लक्ष्य केलं. तसंच लॉकडाऊनच्या काळात केंद्र सरकारच्या बेजबाबदार वागण्यामुळे मजूर वर्गाचे मोठे हाल झाल्याचे सांगत मोदी सरकार कामगार विरोधी सरकार असल्याची टीका राहुल यांनी केली.

दुसरीकडे केंद्र सरकारने पास केलेल्या कृषी कायद्यावर बोलताना राहुल गांधी म्हणाले, “दसऱ्याच्या दिवशी रावणाच्या पुतळ्याऐवजी आपल्या पंतप्रधानांचा पुतळा जाळण्यात आला. मला हे पाहून दु:ख झालं. पंतप्रधानांचा अशा प्रकारे पुतळा जाळणं योग्य नाही. पण शेतकऱ्यांनी देखील आपल्या दु:खाला समोर ठेऊनच असं कृत्य केलं”

पहिल्या टप्प्यातलं आज मतदान

 बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात एकूण 71 जागांसाठी हे मतदान होत आहे. जवळपास 2 कोटी मतदार आज 1 हजार 66 उमेदवारांचं भविष्य ठरवणार आहेत.

पहिल्या टप्प्यात अनेक दिग्गजांचं भवितव्य मशिनबंद होणार

पहिल्या टप्प्यात बिहारमधील अनेक दिग्गजांचं भवितव्य ठरणार आहे. त्यात बिहारचे कृषीमंत्री आणि भाजप नेते डॉ. प्रेम कुमार, कामगारमंत्री विजय कुमार सिन्हा, अनुसूचित जानी आणि जमाती कल्याण मंत्री बृजकिशोर बिंद, JDUचे नेते आणि बिहारचे शिक्षणमंत्री कृष्ण नंदन वर्मा, परिवहन मंत्री संतोष कुमार निराला, ग्रामीणविकास मंत्री शैलेश कुमार, विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री जय कुमार सिंह आमि राजस्व मंत्री रामनारायण मंडल यांच्या मतदारसंघाचा समावेश आहे.

महायुती, आघाडी आणि लोकजनशक्तीमध्ये लढत

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप आणि JDU विरुद्ध काँग्रेस आणि RJD  असा सामना सुरु आहे. त्यात चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीनं अधिक रंगत भरली आहे. त्यामुळं बिहारमधील काही मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. दरम्यान, बिहार निवडणूक प्रचारात तेजस्वी यादव आणि चिराग पासवान यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना लक्ष्य केल्याचं पाहायला मिळत आहे.

(Rahul Gandhi taunt pm Modi And Nitish Kumar)

संबंधित बातम्या

“आली-आली-आली, गेली-गेली-गेली”, भाजप अध्यक्षांकडून प्रचारात बिहारमधील लहानपणीचा किस्सा

बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे 23 उमेदवार रिंगणात, कुणाचा फायदा आणि कुणाचा तोटा?

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचारतोफा आज थंडावणार, नड्डा, नितीशकुमार, तेजस्वी यादव यांचा रॅलीचा धडाका!