Coronil | आम्हाला सत्काराची अपेक्षा नाही, पण तिरस्कार तरी करु नका : रामदेव बाबा

| Updated on: Jul 01, 2020 | 1:10 PM

"पतंजलीने केलेल्या प्रयत्नात तीन दिवसात 69 टक्के आणि सात दिवसात शंभर टक्के रुग्ण बरे झाले. त्याची सविस्तर माहिती आम्ही आयुष मंत्रालयाला दिली आहे", असं स्पष्टीकरण रामदेव बाबा यांनी दिलं (Ramdev Baba on Coronil medicine).

Coronil | आम्हाला सत्काराची अपेक्षा नाही, पण तिरस्कार तरी करु नका : रामदेव बाबा
ramdev baba
Follow us on

देहरादून : “कोरोनाविरोधाच्या लढाईत पतंजलीने जे काम केलं त्याची स्तुती करावी, असा माझा आग्रह नाही (Ramdev Baba on Coronil medicine). आम्हाला सत्काराची अपेक्षा नाही. मात्र, तिरस्कार तरी करु नका”, असं योगगुरु रामदेव बाबा म्हणाले आहेत. “पतंजलीने केलेल्या प्रयत्नात तीन दिवसात 69 टक्के आणि सात दिवसात शंभर टक्के रुग्ण बरे झाले. त्याची सविस्तर माहिती आम्ही आयुष मंत्रालयाला दिली आहे”, असं स्पष्टीकरण रामदेव बाबा यांनी दिलं (Ramdev Baba on Coronil medicine).

योगगुरु रामदेव बाबा यांनी गेल्या आठवड्यात कोरोना विषाणूच्या संसर्गावर पहिलं आयुर्वेदिक औषध शोधल्याचं जाहीर केलं. त्यानंतर लगेच त्याचदिवशी संध्याकाळी केंद्रीय आयुष मंत्रालयाने या औषधाच्या जाहिरातीवर बंदी घातली होती. या बंदीनंतर रामदेव बाबा यांच्यावर सोशल मीडियावर टीका केली गेली. याशिवाय राजस्थान सरकारनेदेखील हा दावा खोटा असल्याचा आरोप केला. या सर्व प्रकरणावर आज रामदेव बाबा यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं.

“कोरोनिल औषधाच्या प्रयोगासाठी ज्यांची परवानगी घ्यायची होती, त्या सर्वांचे प्रमाणमंत्र आम्ही आयुष मंत्रालयाकडे सुपूर्द केले आहेत”, असं रामदेव बाबा म्हणाले. याशिवाय पतंजलीच्या प्रयत्नाचे आयुष मंत्रालयाने कौतुक केलं आहे, असंदेखील त्यांनी यावेळी सांगितलं.

“टीका आणि अफवा पसरवणाऱ्या लोकांच्या प्रयत्नांवर पाणी फिरलं आहे. कारण आयुष मंत्रालयाने पतंजलीच्या कामाचं कौतुक केलं आहे. कोरोनाविरोधाच्या लढाईत पतंजलीने चांगला पुढाकार घेतला आहे. पतंजलीचा प्रयोग योग्य मार्गावर सुरु आहे, असं आयुष मंत्रालय म्हणालं आहे”, असं रामदेव बाबा यांनी सांगितलं.

“पतंजलीने बीपी, डायबिटीज, थायरॉईड, कॅन्सर सारख्या विविध आजारांची लागण झालेल्या कोट्यवधी लोकांना जीवन दिलं आहे. पतंजलीने गेल्या तीन दशकात 10 ते 20 कोटी लोकांना प्रत्यक्ष आणि जगभरातील 200 कोटी पेक्षा जास्त लोकांना योग, आयुर्वेदद्वारे स्वस्थ जीवन दिलं आहे. हा गुन्हा आहे का?”, असा सवाल रामदेव बाबा यांनी केला.

“देशात योग, आयुर्वेदाचं काम करणं हा गुन्हा आहे, असं वातावरण तयार करण्यात आलं. शेकडो ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला. एखाद्या देशद्रोही किंवा अतिरेकीविरोधात जसा गुन्हा दाखल होतो तसे गुन्हे दाखल करण्यात आले”, असं रामदेव बाबा म्हणाले.

“काही माथेफिरु लोकांनी रामदेव बाबा जेल जाणार, अशी अफवा पसरवली. मी तसा काय गुन्हा केला? ही मानसिकता आपल्याला कुठे घेऊन जाणार? स्वामी रामदेव आणि आचार्य बालकृष्ण आम्ही दोघं 35 वर्षांपासून देश आणि जगासमोर सेवा करत आहोत. एक सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेऊन इतपर्यंत आलो. योग आयुर्वेद क्षेत्रात काम केलं. मात्र आता योग आणि आयुर्वेदची प्रगती काही लोकांना खटकत आहे. हे योग्य नाही”, असंदेखील रामदेव बाबा म्हणाले.

“तुम्हाला स्वामी रामदेवचा राग येत असेल तर शिव्या द्या. तुम्हाला आचार्य बालकृष्ण यांच्याबद्दल राग येत असेल तर त्यांचीदेखील निंदा करा. पण जे लोक कोरोनाबाधित आहेत त्यांच्याप्रती थोडी तरी सहानुभूती ठेवा”, असं आवाहन रामदेव बाबांनी केलं.

“पतंजलीने बीपी, डायबिटीज, थायरॉईड, कॅन्सर सारख्या विविध आजारांची लागण झालेल्या कोट्यवधी लोकांना जीवन दिलं आहे. पतंजलीने गेल्या तीन दशकात 10 ते 20 कोटी लोकांना प्रत्यक्ष आणि जगभरातील 200 कोटी पेक्षा जास्त लोकांना योग, आयुर्वेदद्वारे स्वस्थ जीवन दिलं आहे. हा गुन्हा आहे का?”, असा प्रश्न रामदेव बाबा यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.