औरंगाबादहून जळगावला रस्त्याने यायचं म्हटलं तर अंग चेपायची किंवा डॉक्टरची व्यवस्था करावी लागते : शरद पवार
"जळगाव जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था बिकट आहे. औरंगाबादहून रस्त्याला यायचं म्हटलं तर प्रथम अंग चेपायची किंवा डॉक्टरची व्यवस्था करावी लागते", असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.
जळगाव : “जळगाव जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था बिकट आहे. औरंगाबादहून रस्त्याला यायचं म्हटलं तर प्रथम अंग चेपायची किंवा डॉक्टरची व्यवस्था करावी लागते”, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. ते जळगावच्या चोपडा तालुक्यातील चोपडा सहकारी सूत गिरणी उद्धघाटनाच्या कार्यक्रमात बोलत होते.
“आज आम्ही हेलिकॉप्टरने आलो. पण माझी नेहमी इच्छा असते की, जिल्ह्यात गाडीने जावं. कारण रस्त्याने जात असताना आम्हाला शेतीच्या परिस्थितीची माहिती घेता येते. मात्र, औरंगाबादहून जळगावला रस्त्याने यायचं म्हटलं तर प्रथम अंग चेपायची किंवा डॉक्टरांची व्यवस्था करावी लागते. जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था बिकट आहे. पण सुदैवाने सरकार बदलले आहे. लवकरच बदल होतील”, असा दावा शरद पवार यांनी केला (Sharad Pawar on Aurangabad-Jalgaon road).
“मला सगळे म्हणतात की, मी पिकवणाऱ्यांचा विचार जास्त करतो. हो, हे खरं आहे. कारण पिकवणारा जगला तर खाणारे जगतात. सध्या देशात शहरी संस्कृतीकडे कल आहे. मात्र, यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. केंद्र सरकारचा शेतकऱ्यांविषयी दृष्टिकोन वेगळा आहे. शेतकरी जास्त पिकवेल आणि खाणाऱ्यांची गरज भागेल, असा दुहेरी प्रोग्रॅम राबविण्याची सध्या गरज आहे. शेतीमध्ये गुंतवणुकीची गरज आहे. या गुंतवणुकीमुळे बेकारी दूर करण्यासाठीदेखील मदत होईल. महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी ठरवले आहे की राज्याच्या हिताचं विचार करायचा आणि यासाठी सत्तेचा वापर करायचा”, असं आश्वासन शरद पवार यांनी दिलं.