उस्मानाबाद : राज्यातील शेतकऱ्यांची सरकारकडून पुन्हा एकदा क्रूर थट्टा करण्यात आली असून नाशिक व वर्धा जिल्ह्यात केवळ एका शेतकऱ्याला नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली आहे . राज्य सरकारने एप्रिल व मे 2018 मध्ये राज्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटच्या नुकसानीचा आकडा जाहीर केला असून त्यांना नुकसान भरपाईची रक्कम जाहीर केली आहे . नाशिक व वर्धात प्रत्येकी एका शेतकऱ्याचे नुकसान झाल्याचा जावईशोध शासकीय यंत्रणेतील अधिकारी व सरकारने लावला आहे. नाशिक येथील एका शेतकऱ्याला त्याचे 40 गुंठे म्हणजे 1 एकर क्षेत्रात झालेल्या नुकसानी पोटी 5 हजार तर वर्धा येथील एका शेतकऱ्याला त्याचे 5 गुंठे क्षेत्रात झालेल्या नुकसानीपोटी 1 हजार नुकसान भरपाई जाहीर केली आहे . प्रत्यक्षात राज्यात एप्रिल व मे महिन्यात झालेल्या अवकाळीने धुमाकूळ घालत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते .
राज्यातील एकूण 17 हजार 135 शेतकऱ्यांना 11 कोटी 7 लाख 99 हजार 195 रुपये नुकसान भरपाई जाहीर केली असून 6 हजार 834 हेकटर क्षेत्रावर अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झाले आहे असे सरकारचे म्हणणे आहे. एप्रिल महिन्यात राज्यातील 25 तर मे महिन्यात राज्यातील 13 जिल्ह्यातील पिके व फळपिकांचे नुकसान झाले असून राज्य सरकारच्या महसूल व वन विभागाने 18 डिसेंबर रोजी याबाबतचा शासन आदेश जारी केला आहे .
बाधित शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करताना महसूल व कृषी विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या संयुक्त पंचनाम्याच्या आधारे पिकांचे 33 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्या प्रकरणी मदत अनुज्ञेय असणार आहे . पिकांच्या नुकसानीकरीता आलेली ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे .
सरकारी आकडेवारी पाहता अवकाळी पाऊस व गारपिटीने नाशिक आणि वर्धा जिल्ह्यातील प्रत्येकी एका शेतकऱ्याला फटका बसला असेच म्हणावे लागेल, अधिकारी व सरकारने हा निष्कर्ष कोणत्या आधारे काढला हे प्रश्नचिन्ह आहे
नुकसान भरपाईची विभागनिहाय आकडेवारी :