उष्माघाताने पोलीस शिपायाचा मृत्यू

| Updated on: Jun 08, 2019 | 8:38 AM

तापमानाचा पारा जिल्ह्यात उच्चांक गाठत आहे. याचा नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होताना दिसत आहे. नागपूर जिल्ह्याच्या बेला येथून  वर्धेला दुचाकीने येत असलेल्या पोलीस शिपायाचा उष्माघाताने शुक्रवारी दुपारी मृत्यू झाला.

उष्माघाताने पोलीस शिपायाचा मृत्यू
Follow us on

वर्धा : तापमानाचा पारा जिल्ह्यात उच्चांक गाठत आहे. याचा नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होताना दिसत आहे. नागपूर जिल्ह्याच्या बेला येथून वर्धेला दुचाकीने येत असलेल्या पोलीस शिपायाचा उष्माघाताने शुक्रवारी दुपारी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बाळकृष्ण इवनाथे असं पोलीस शिपायाचे नाव असून ते नागपूर जिल्ह्याच्या बेला पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते. गेल्या 15 दिवसात वर्धा जिल्ह्यात 8 लोकांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

बाळकृष्ण इवनाथे हे नागपूर जिल्ह्यातील बेला पोलीस स्टेशनला कार्यरत होते. नुकतंच त्यांची जलालखेडा येथे बदली झाली होती. 6 जूनला बाळकृष्ण यांना बेला येथून कार्यमुक्त करण्यात आले होते. मात्र पोलीस स्टेशनचे काही काम प्रलंबित असल्याने ते काल (7 जून) दुपारी दुचाकीने वर्धा येथे निघाले होते. दुचाकीने जात असताना उमरी (कुर्ला) जवळ त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे ते जवळच्या बस स्थानकावर असलेल्या झाडाखाली बसले आणि काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती समुद्रपूर पोलिसांना मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. या पोलीस शिपायाचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र शवविच्छेदन अहवालानंतर याचं नेमकं कारण स्पष्ट होईल.

जिल्ह्यात वाढत्या तापमानाने सर्वाधिक समुद्रपूर तालुक्यात पाच लोकांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे तर वर्धा तालुक्यात दोन आणि आष्टी तालुक्यात एक असा एकूण आठ लोकांचा मागील पंधरा दिवसात मृत्यू झाला आहे. दरम्यान, नागपूरमध्येही 28 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.