आयपीएल 2026 स्पर्धेची थेट अंतिम फेरी गाठण्याची गुजरातची संधी हुकली, कर्णधार शुबमन गिल म्हणाला..
आयपीएल 2026 स्पर्धेतील क्वॉलिफायर 1 सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात पार पडला. या सामनयात आरसीबीने 255 धावांचं लक्ष्य गुजरातसमोर ठेवलं होतं. पण हे लक्ष्य काही गुजरातला गाठता आलं नाही. या पराभवाचं विश्लेषण कर्णधार शुबमन गिलने करत सांगितलं की..

आयपीएल 2026 स्पर्धेतली क्वॉलिफायर 1 सामन्यात गुजरात टायटन्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी झाला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकून गुजरात टायटन्सला काहीच फायदा झाला नाही. गोलंदाजी निवडली खरी पण पहिल्या डावात आरसीबीने बाजी मारली. आरसीबीने पहिल्या डावात 20 षटकात 5 गडी गमवून 254 धावा केल्या आणि विजयासाठी 255 धावा दिल्या. या धावांचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सला पावरप्लेमध्येच धक्का बसला. साई सुदर्शन आणि शुबमन गिल हे स्वस्तात बाद झाले. त्यानंतर जोस बटलरची विकेट पडली आणि सामना आरसीबीच्या बाजूने झुकला. त्यामुळे गुजरात टायटन्सच्या पराभवाची स्क्रिप्ट पावरप्लेमध्येच लिहिली गेली. गुजरात टायटन्सने हा सामना गमावला आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ अंतिम फेरीत पोहोचला. आयपीएल स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. मागच्या पर्वात आरसीबीने जेतेपद पटकावलं होतं. त्यामुळे यंदाही जेतेपदाची अपेक्षा वाढली आहे. तर गुजरात टायटन्सला या पराभवासह क्वॉलिफायर 2 सामन्यात लढत द्यावी लागेल. या सामन्यात विजय मिळाला तर अंतिम फेरीचं तिकीट मिळेल.
काय म्हणाला शुबमन गिल?
आयपीएल 2026 स्पर्धेतील पराभवानंतर गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिल म्हणाला की, ’12व्या, 13व्या षटकापर्यंत आमची कामगिरी बऱ्यापैकी चांगली होती. पण क्षेत्ररक्षण अपेक्षेप्रमाणे झाले नाही, झेल घेणे आणि मैदानी क्षेत्ररक्षणही. हा त्या सामन्यांपैकी एक होता जो आम्हाला विसरून पुन्हा नव्याने सुरुवात करायची आहे..आम्ही सांघिक बैठकांमध्ये आणि सराव सत्रांमध्ये क्षेत्ररक्षणावर लक्ष देतो, पण दबावाच्या परिस्थितीत आमची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. धावांचा पाठलाग करताना, विशेषतः पॉवरप्लेमध्ये, चांगली सुरुवात करणे महत्त्वाचे असते. अशा मैदानावर चेंडू खूप दूर जातो, मैदानाची बाहेरील बाजू वेगवान असते, जर आम्हाला चांगली सुरुवात मिळाली असती तर धावांचा पाठलाग करणे शक्य झाले असते. अशा प्रकारे गडी बाद होणं सहसा पाहायला मिळत नाही, हे खूप दुर्दैवी आहे.’
आयपीएल 2026 स्पर्धेच्या एलिमिनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात लढत होणार आहे. या सामन्यात विजेता संघ क्वॉलिफायर 2 मध्ये गुजरात टायटन्सशी लढत करेल. क्वॉलिफायर 2 सामना 29 मे रोजी होणार आहे. क्वॉलिफायर 2 फेरीत जिंकणारा संघ अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू लढत करेल. त्यामुळे आता अंतिम फेरीत दुसरा कोणता असेल? याची उत्सुकता आहे.
