शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नाही अशी तक्रार आली नाही पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी दरडावलं

| Updated on: Jun 08, 2020 | 10:31 PM

शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळत नाही अशी तक्रार आली नाही पाहिजे, असे स्पष्ट मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे (Uddhav Thackeray on Farmer loan)

शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नाही अशी तक्रार आली नाही पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी दरडावलं
Follow us on

मुंबई : आगामी खरीप हंगामामध्ये बी बियाणांचा तुटवडा पडू देऊ नका. बोगस बियाणांच्या प्रकारात कडक शिक्षा होईल हे पहा आणि कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना लवकरात लवकर पिक कर्ज मिळण्यासाठी बँकांच्या शाखांपर्यंत शासनाचे निर्देश पोहचावा. शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळत नाही अशी तक्रार आली नाही पाहिजे, असे स्पष्ट मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे (Uddhav Thackeray on Farmer loan). यातून त्यांनी अधिकाऱ्यांना दरडावत शेतकऱ्यांबाबत कोणतीही हयगय चालणार नाही, असाच संदेश दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कृषि खरीप हंगाम कामांचा आढावा आणि बी बियाणे, खते, किटकनाशके, पिक कर्ज वाटप, कापूस, तुर व धान खरेदीबाबत आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रीयीकृत बँकांकडून शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नाही अशी तक्रार येणार नाही यासाठी काळजी घेण्याच्या स्पष्ट सुचना प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच बोगस बियाणांची विक्री करुन शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचेही आदेश त्यांनी दिले. याबैठकीत माहिती देण्यात आली की, खरीप हंगामासाठी 43.50 लाख मेट्रिक टन इतकी मागणी केंद्राकडे नोंदवली होती. त्यापैकी 40 लाख मेट्रिक टन पुरवठ्यास मंजुरी आली आहे. याशिवाय 50 हजार मेट्रिक टन युरियाचा संरक्षित साठा करण्यात येत आहे.


5 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना बांधावर बियाणे

खते व बी बियाणे बांधावर पुरविण्यासाठी 47 हजार 89 शेतकरी गट तयार करण्यात आले आहेत. 1 लाख 55 हजार 755 मेट्रिक टन खत, 86 हजार 126 मेट्रिक टन बियाणे , 1 लाख 80 हजार 481 कापूस बियाणे पाकिटे बांधावर देण्यात आली आहेत. एकूण 5 लाख 27 हजार 483 शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला आहे. एकंदर 381 लक्ष क्विंटल कापूस खरेदी झाली आहे. 9 लाख क्विंटल खरेदी राहिली आहे. 18.81 लाख क्विंटल तूर खरेदी झाली असून 2 लाख शेतकऱ्यांकडून तूर खरेदी करण्यात आली. 822 कोटी रुपयांचे चुकारे उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. 18.90 लाख क्विंटल चणा खरेदी झाली असून 15 जुलैपर्यंत मुदतवाढ मागण्यात आली आहे. याचेही चुकारे लवकरच शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत.

‘पिक कर्ज वाटपाला गती द्यावी’

यावेळी बोलताना कृषी मंत्री दादा भुसे म्हणाले, “पिक कर्ज वाटपाला अधिकाधिक गती देण्याच्या सुचना यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. बँकांच्या संपर्कात अधिकारी आहेत.” यावेळी प्रधान सचिव आभा शुक्ला यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून एकूण 46 टक्के तर राष्ट्रीयकृत बँकांकडून 7 टक्के पिक कर्ज वाटप झाल्याची माहिती दिली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी 6250 कोटी, तर राष्ट्रीयकृत बँकांनी 2300 कोटी रुपये पिक कर्ज वाटप केल्याची माहिती त्यांनी दिली. बँकांच्या प्रत्येक शाखांपर्यंत शासनाचा 22 मेचा शासन निर्णय पोहोचविणे सुरू असून शेतकऱ्यांना पिक कर्जात अडथळा येऊ नये अशा सूचना दिल्याचेही त्या म्हणाल्या.

निसर्ग चक्रीवादळ शेतीचे नुकसान

निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी आणि रायगड येथे 4650 हेक्टर जमीन आणि 18 हजार हेक्टर फळपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती देण्यात आली. या बैठकीला कृषि मंत्री दादाजी भुसे, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील सहभागी झाले होते. यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता, सचिव कृषि एकनाथ डवले, प्रधान सचिव सहकार आभा शुक्ला, प्रधान सचिव पदुम व पणन अनुप कुमार, सचिव, अन्न व नागरी पुरवठा संजय खंदारे, व्यवस्थापकीय संचालक, कापूस उत्पादक महासंघ नवीन सोना,आयुक्त कृषि सुहास दिवसे, व्ववस्थापकीय संचालक, महाबीज उपस्थित होते

हेही वाचा :

पत्र्यांऐवजी घरांवर सिमेंट स्लॅब, वीज पडून नुकसान टाळण्यासाठी लाइटनिंग अरेस्टर, कोकण उभं करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा प्लॅन

पुण्यात आठवडाभरात 5700 प्रवासी परतले, बिहारमधून दररोज जवळपास 400 लोक पुण्यात

त्र्यंबकेश्वरमध्ये कंत्राटी कामगारांचं स्वत:ला कमरेपर्यंत गाडून घेत आंदोलन

Uddhav Thackeray on Farmer loan