कोरोनाविरुद्ध सामना, डॉ. संजय ओक ते रघुनाथ माशेलकर, ठाकरेंच्या टीममध्ये हुकमी एक्के

| Updated on: Apr 14, 2020 | 11:13 PM

महाराष्ट्र आगामी परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज असून त्यासाठी विविध तज्ज्ञांच्या नेतृत्वात स्थापन केलेल्या समित्यांची माहिती दिली (Uddhav Thackeray declared Expert committees).

कोरोनाविरुद्ध सामना, डॉ. संजय ओक ते रघुनाथ माशेलकर, ठाकरेंच्या टीममध्ये हुकमी एक्के
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, लॉकडाऊनच्या मुदत वाढ आणि वांद्रे येथील कामगारांचा घरी परतण्यासाठीचा उद्रेक या पार्श्वभूमीवर राज्यातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्र आगामी परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज असून त्यासाठी विविध तज्ज्ञांच्या नेतृत्वात स्थापन केलेल्या समित्यांची माहिती दिली (Uddhav Thackeray declared Expert committees). यात डॉ. संजय ओक यांच्यापासून अगदी शास्त्रज्ञ रघुनाश माशेलकर यांच्यापर्यंतच्या नावांचा समावेश आहे. महाराष्ट्राचे हे भूमीपुत्र नक्कीच हे आव्हान परतवून लावतील, असाही विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

उद्धव ठाकरे म्हणाले, कोरोनाच्या संकटानंतर आणखी एक संकट येणार आहे. हे संकट आर्थिक असणार आहे. त्यामुळे त्याचा सामना करण्यासाठीही आपण आतापासूनच तयारी करायला हवी. त्यासाठी आपण दोन गट तयार केले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रीगट तयार करण्यात आला आहे. त्याचं काम सुरु झालं आहे. म्हणजे लॉकडाऊन हळूहळू शिथिल करताना कसा शिथिल करावा, कोणाला परवानगी द्यायची, किती प्रमाणात परवानगी द्यायची, आपलं नेमकं आर्थिक धोरण काय असावं, काय खबरदारी घ्यावी, आणखी काय उपाययोजना करायला हव्यात याचा संपूर्ण अभ्यास ही मंत्र्यांची टीम करेल. ”

मुख्यमंत्र्यांच्या टीममधील हुकमी एक्के

  • डॉ. रघुनाथ माशेलकर
  • विजय केळकर
  • दिपक पारेख
  • अजित रानडे
  • अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील मंत्रीगट

आपण वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनाही एकत्र केलं आहे. डॉ. रघुनाथ माशेलकर यांची ओळख करुन देण्याची गरज नाही. आपणा सर्वांना माहिती आहे. अशी अनेक नामवंत मोठी माणसं आपल्या महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्राचे हे सर्व वीरपूत्र, काही आपल्या भगिणी आहेत अशा सर्वांची एक टीम केली जात आहे. माशेलकर यांचा तंत्रज्ञान क्षेत्रात कुणी हात धरु शकत नाही. त्यांच्यासोबत विजय केळकर, दिपक पारेख, अजित रानडे असे काही नामवंत अर्थतज्ज्ञ देखील आहेत. यांची एक टीम तयार केली आहे, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.

ते म्हणाले, “यातून या संकटाच्या काळात पहिला आपला बचाव कसा करावा, आपल्या अर्थव्यवस्थेला कमीत कमी धक्का लागेल, कमीत कमी दुष्परिणाम होईल यासाठी प्रयत्न केला जाईल. हे संकट निभावल्यानंतर पुन्हा आपल्याला जी झेप घ्यायची आहे ती घेताना आत्तापासून काय काळजी घ्यावी याचा ते अहवाल करतील. त्यांनी तसा अहवाल देण्यास सुरुवात देखील केली आहे.”

शेतकरी-बळीराजा हा आपल्या देशाचा आत्मा आहे. संपूर्ण जगरहाटी दोन घासासाठी चालते. ते दोन घास देणाऱ्या अन्नदात्याला या लॉकडाऊनच्या काळात आपण कोठेही अडवलेले नाही, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.

सरकारकडून स्थापन झालेल्या इतर समिती

दरम्यान, राज्या सरकारने मुंबई शहर व परिसरात कोरोनाची विषाणूबाधा व मृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना व विश्लेषण करण्याकरता 7 सदस्यीय समिती नेमण्यात आली आहेत. कोरोनामुळे होणाऱ्या मुत्यूच्या कारणांचे विश्लेषण आणि त्यानुसार मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी ही समिती उपाययोजना सुचविणार आहे. त्याचबरोबर कोरोना उपचारासाठी रुग्णालयांना आवश्यक त्या तयारीसाठी मार्गदर्शन देखील केले जाणार आहे.

मुंबई शहरासाठी नेमलेल्या समितीच्या अध्यक्षपदी के.ई.एम. रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे असून के. ई.एम. रुग्णालयाचे औषधी वैद्यक शास्त्र प्रमुख डॉ. मिलिंद नाडकर, सायन रुग्णालयाचे अतिदक्षता विभागप्रमुख डॉ. नितीन कर्णीक , जे.जे. रुग्णालयाचे कम्युनिटी मेडीसीनचे प्रा.डॉ. छाया राजगुरू, जे.जे. रुग्णालयाच्या औषधी वैद्यक शास्त्र विभाग प्रमुख डॉ. विद्या नागर, आरोग्य विभागाचे माजी महासंचालक डॉ. सुभाष साळुंके यांचा समिती सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. तर आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे समितीच्या सदस्य सचिव आहेत.

मुंबई वगळून उर्वरित राज्य असे कार्यक्षेत्र असलेल्या या समितीत सहा तज्ज्ञ सदस्य असून आरोग्य संचालक समितीचे अध्यक्ष आहेत. राज्याच्या समितीत माजी आरोग्य संचालक डॉ. पी.पी. डोके, औषधी वैद्यक शास्त्राचे निवृत्त प्राध्यापक डॉ. ए. एल. काकराणी व डॉ. दिलीप कदम, पुणे येथील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या औषधी वैद्यक शास्त्र विभागप्रमुख डॉ. शशीकला सांगळे, आरोग्य सहसंचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

मला राजचीही साथ, उद्धव ठाकरेंकडून एकजुटीचा उल्लेख

प्लाझ्मा ट्रिटमेंट आणि बीसीजी व्हॅक्सिनचे प्रयोग, यश आल्यास महाराष्ट्र जगाला दिशा देईल : मुख्यमंत्री

Extended Lockdown : वांद्र्यातील गर्दी ते आगीचे बंब, टास्क फोर्स ते तज्ज्ञ समिती, मुख्यमंत्र्यांचे 10 महत्त्वाचे मुद्दे

Uddhav Thackeray declared Expert committees to fight corona