शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला, भेटीगाठीच्या सिलसिल्यामागचं नेमकं कारण काय?

| Updated on: Jul 15, 2021 | 6:08 PM

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात गेल्या काही दिवसांतील ही तिसरी भेट आहे. त्यामुळे या भेटीगाठीच्या सिलसिल्यामागे नेकमं कारण काय? असा सवाल आता विचारला जात आहे.

शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला, भेटीगाठीच्या सिलसिल्यामागचं नेमकं कारण काय?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार भेट
Follow us on

मुंबई : सह्याद्री अतिथीगृहावर शेतीविषयक बैठक पार पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात गेल्या काही दिवसांतील ही तिसरी भेट आहे. त्यामुळे या भेटीगाठीच्या सिलसिल्यामागे नेकमं कारण काय? असा सवाल आता विचारला जात आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील घटकपक्षांमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचं सातत्याने बोललं जातं. त्यामुळे सध्याची राजकीय स्थिती, विधानसभा अध्यक्षपद निवडणूक आणि महामंडळ वाटपाच्या मुद्द्यावर या बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. मात्र, दुसरीकडे पवार-ठाकरे भेटीमागे अन्य महत्वाची कारणंही राजकीय विश्लेषकांकडून दिली जात आहेत. (Meeting between Sharad Pawar and CM Uddhav Thackeray)

पवार-ठाकरे बैठकीमागे ‘हे’ तीन कारणं?

राज्यात गेल्या काही दिवसांत काँग्रेसनं अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सातत्याने स्वबळाचा नारा देत आहे. इतकंच नाही तर आता पटोले यांनी थेट बारामतीमध्ये ओबीसी बैठकीचं आयोजन केलं आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपासून भाजपकडून हे सरकार पाडण्याचा सातत्याने प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी अलीकडे केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. त्यातून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जेरीस आणून एका पक्षाला आपल्यासोबत घेत सरकार स्थापन करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

त्याचबरोबर दिल्लीत शरद पवार राष्ट्रीय स्तरावर विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत असल्याचं पहायला मिळतं. त्यासाठी राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांच्या भेटीगाठी सुरु आहेत. त्याचवेळी भाजपसोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न करणं. हा प्रयत्न शिवसेनेकडूनही सुरु आहे. या मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीत चर्चा होऊ शकते, असा अंदाज राजकीय विश्लेषक संजय आवटे यांनी व्यक्त केलाय.

संसंदीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पवार-ठाकरे बैठक

उद्धव ठाकरे आणि शरद पवार ज्यावेळी भेटतात तेव्हा हवापाण्याच्या गप्पा होत नाही. 19 तारखेला संसदेचं अधिवेशन सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील, महाविकास आघाडीच्या खासदारांची भूमिका काय असावी? कोणते मुद्दे उपस्थित करावेत? या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असावी असा अंदाज आहे. राज्यातील मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण असे मुद्दे बैठकीत येतच असतात. पण प्रामुख्याने संसदीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा होऊ शकते, असं मत राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांनी मांडलं आहे.

संबंधित बातम्या :

राज्याच्या पर्यटन विकासासाठी 250 कोटींचा निधी, प्रायोगिक तत्वावर 10 जिल्ह्यात ‘जिल्हा पर्यटन अधिकारी’

SEBC Category : एसईबीसी प्रवर्गातील नियुक्त्यांबाबत महाविकास आघाडी सरकारचा महत्वाचा निर्णय

Meeting between Sharad Pawar and CM Uddhav Thackeray