चेतन व्यास,टीव्ही 9 मराठी, वर्धा : वर्ध्यातील महाकाली मार्गावरील 52 वर्ष जुना पूल खचल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. सुदैवाने महाडजवळच्या सावित्री पूल दुर्घटनेची पुनरावृत्ती टळली.
खरांगणा (मोरांगणा) ते कारंजा,कोंढाळी मार्गावरील धाम नदीवर हा पूल आहे. रात्री 11 च्या सुमारास पुलाच्या मध्यभागातील पिलर खचला. मात्र सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. वाहनं निघून गेल्यानंतर हा पूल खचला.
याबाबतची माहिती खरांगणा पोलिसांना मिळताच ठाणेदार संतोष शेगावकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी या ठिकाणची वाहतूक तात्काळ थांबवली. हा पूल राज्य महामार्गावर असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो.
साधारण 1964 मध्ये पुलाची निर्मिती झाली आहे. 52 वर्षात मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वाहतूक झाली आहे. या मार्गाचा इतर मार्गाच्या तुलनेत मध्यप्रदेशमधून हैदराबादकडे जाण्यासाठी उपयोग होतो. या पुलामुळे जवळपास 100 किलोमीटरचा फेरा वाचतो. शिवाय टोल वाचवण्यासाठी या मार्गाचा उपयोग होते. महाकालीचे प्रसिद्ध देवस्थानसुद्धा या मार्गावर आहे.