Iran War Update : भारताशी संबंधित घटना इराण कधीच विसरणार नाही, अमेरिकेला थेट धमकी, बदला घेणार तो ही…
Iran Israel US War Update : इराण विरुद्ध युद्ध दिवसेंदिवस अजून चिघळत चाललं आहे. इराणने अमेरिकेला थेट धमकी दिली आहे. त्या घटनेचा संबंध भारताशी आहे. इराणने जे शब्द वापरलेत ते निश्चितच अमेरिकेला घाम फोडणारे आहेत.

इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका युद्ध दिवसेंदिवस अजून भयानक होत चाललं आहे. हे युद्ध लवकर थांबण्याची कुठलीही चिन्ह दिसत नाहीयत. उलट संघर्ष अजून चिघळत चालला आहे. दोन्ही बाजू परस्परांवर अजून घातक हल्ले करत आहेत. आता इराणच्या नौदल प्रमुखांनी अमेरिकेला बदला घेण्याची धमकी दिली आहे. काही दिवसांपूर्वी हिंद महासागरात अमेरिकन नौदलाने इराणची IRIS देना ही युद्धनौका बुडवली होती. इराण ही गोष्ट विसरलेला नाही. भारताच्या वेशीवरच ही घटना घडली होती. यात 87 इराणी नौसैनिकांचा मृत्यू झाला होता. “तुम्ही आमची युद्ध नौका बुडवली. आम्ही या कारवाईला भयानक प्रत्युत्तर देऊ” असं इराणच्या नौदल प्रमुखांनी म्हटलं आहे.
इराणमधील सरकारी प्रक्षेपण वाहिनी प्रेस टीव्हीशी बोलताना इराणी नौदल कमांडर शाहराम इराणी यांनी हा इशारा दिला. ‘आम्ही या कृत्याचा बदला घेऊ, त्यांनी अमेरिकेला एवढं सुद्धा म्हटलं की, हा हल्ला अचानक होईल’. “शत्रुचा गुन्हा आम्ही विसरणार नाही. आमच्या शहीद सैनिकांच्या रक्ताचा बदला घेऊ. शत्रुला हे समजलं पाहिजे की, आम्ही सुद्धा भयानक हल्ला करुन शासन करु शकतो” असं शाहराम इराणी म्हणाले.
श्रीलंकेच्या समुद्रात ही घटना घडली
इराणचे लष्करप्रमुख अमीर हात्मी यांनी सुद्धा 14 मार्चला असाच इशारा दिला होता. “आमच्या युद्धनौकेवरच्या नैसैनिकांचं बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही. हल्ल्याला आम्ही उत्तर देणार” “आमची युद्धनौका एका शांतता मोहिमेवर होती. लष्करी कवायत करुन परतत असताना त्यांच्यावर हल्ला झाला” असं हात्मी म्हणाले. श्रीलंकेच्या समुद्रात ही घटना घडली होती.
भारताने बोलावलेलं
अमेरिकन पाणबुडीने इराणी फ्रिगेटवर टॉरपीडोद्वारे हल्ला करुन ही युद्धनौका बुडवली. इराणने या कृत्याला युद्ध गुन्हा ठरवलं आहे. या युद्धनौकेला भारतीय नौदलाने युद्ध सरावासाठी बोलावलं होतं. भारतीय बंदरातून इराणच्या दिशेने IRIS देना निघाली होती. त्यावेळी वाटेत श्रीलंकेजवळ अमेरिकेने हल्ला करुन या युद्धनौकेला जलसमाधि दिली.
भारताने काय मदत केली?
श्रीलंकेच्या दक्षिणेला 4 मार्च रोजी ही इराणी युद्धनौका बुडाली. गॉलपासून 20 नॉटिकल माइल्स अंतरावर असताना टॉरपीडोद्वारे हा हल्ला झाला. या युद्धनौकेवर 180 नौसैनिक होते. यात 87 जणांचा मृत्यू झाला. 32 जणांची श्रीलंकन नौदलाने सुटका करुन त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. ही युद्धनौका बुडाल्यानंतर भारताने बेपत्ता इराणी नौसैनिकांच्या शोधासाठी दोन युद्धनौका आणि P-8I पोसीडोन विमान तैनात केलं होतं.
