बारामतीला निरेतून मिळणारं पाणी बंद, दोन रणजतिसिंहांचा पवारांना शह

| Updated on: Jun 05, 2019 | 12:19 PM

लोकसभा निवडणुकीनंतर मोहिते पाटील आणि नाईक-निंबाळकरांनी पवारांना पहिला मोठा धक्का दिला आहे.

बारामतीला निरेतून मिळणारं पाणी बंद, दोन रणजतिसिंहांचा पवारांना शह
Follow us on

बारामती (पुणे) : माढ्याचे नवनिर्वाचित भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि राष्ट्रवादीचे माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना शह दिला आहे. निरा डाव्या कालव्यातून बारामातीला जाणारं नियमबाह्य पाणी बंद करण्याचे आदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. सोलापुरातील या दोन्ही रणजितसिंह यांनी गिरीश महाजनांच्या माध्यमातून पवारांना शह दिल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगते आहे.

निरा डावा कालव्यातून बारामतीला जाणारं नियमबाह्य पाणी बंद करण्याचे आदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्याने, बारामतीकरांना मोठा धक्का बसला आहे. येत्या दोन दिवसात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यासंदर्भात लेखी आदेश काढणार आहेत.

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2009 साली निरा डावा कालव्यासंदर्भातील करार बदल, बारामतीला 60 टक्के पाणी दिले होते. 2017 मध्येच हा करार संपला होता. मात्र तरीही बारामतीला जाणारं पाणी सुरुच होतं.

अखेर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी बारामतीला निरा डावा कालव्यातून जाणारं पाणी रोखण्याचे आदेश दिले आहेत. राष्ट्रवादीतून भाजपवासी झालेले रणजित सिंह मोहिते पाटील आणि नवनिर्वाचित भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची ही खेळी असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, निरा डावा कालव्यातून बारामती लोकसभा मतदारसंघाला मिळणारा नियमबाह्य पाणी आता माढा मतदारसंघाला मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर मोहिते पाटील आणि नाईक-निंबाळकरांनी पवारांना पहिला मोठा धक्का दिला आहे.

काय आहे पाणी प्रश्न?

वीर भाटघर धरणाच्या उजव्या कालव्यातून 57 टक्के, तर डाव्या कालव्याद्वारे 43 टक्के पाणी वाटपाचं धोरण 1954 च्या पाणी वाटप कायद्यानुसार ठरलं होतं. त्यानुसार उजव्या कालव्यातून सातारा जिल्ह्यातील फलटण, तर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, सांगोला आणि पंढरपूर या तालुक्यांना पाणी मिळत होतं. डाव्या कालव्यातून बारामती आणि इंदापूर तालुक्याला पाणी मिळत होतं. 4 एप्रिल 2007 रोजी शरद पवार आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2009 मध्ये पाणी वाटपाचा करार बदलला. त्यामध्ये निरा देवघर धरणातून 60 टक्के पाणी डाव्या कालव्यातून बारामती आणि इंदापूर तालुक्याला आणि 40 टक्के पाणी फलटण, माळशिरस, सांगोला आणि पंढरपूर तालुक्याला देण्याचा निर्णय घेतला. हा करार 3 एप्रिल 2017 पर्यंतचा करण्यात आला होता. करार संपल्यानंतरही हे पाणी बारामतीला जात होतं.

नियमबाह्य पाणी बंद करुन ते पुन्हा फलटण, माळशिरस, सांगोला आणि पंढरपूर तालुक्यांना मिळावे अशी मागणी रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली होती. याबाबत त्यांनी सोमवारी पुन्हा जलसंपदा मंत्री महाजन यांची भेट घेतली.

जलसंपदा मंत्री महाजन यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा करुन डाव्या कालव्यातून बारामतीला नियमबाह्य जाणारं पाणी कायमचं बंद करण्याचा निर्णय घेतला. याबाबतचा आदेश येत्या दोन दिवसात काढावा असंही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं. हा अध्यादेश निघाल्यास सातारा जिल्ह्यातील वीर, भाटघर, निरा – देवघर या धरणातून बारामती आणि इंदापूर तालुक्याला जाणारं पाणी कायमस्वरुपी बंद होऊन त्याचा फायदा फलटण, माळशिरस, सांगोला आणि पंढरपूर या तालुक्यांना 100 टक्के होणार आहे.