Indian Villages : महाराष्ट्रातील कोट्याधीशांचं गाव ते भूतिया गाव, भारतातील 10 अनोखी गावं, परंपरा जाणून हैराण व्हाल

India Unique Villages: भारतातील गावे सुंदर, पारंपरिक आणि वैशिष्ट्यपूर्ण मानली जातात. यापैकी काही गावे त्यांच्या वैशिष्ट्यामुळे जगभरात प्रसिद्ध आहेत. काही गावांमध्ये कुठे घराला दारच नाही तर, कुठे फक्त जुळ्या मुलांचा जन्म, जाणून व्हाल हैराण

Indian Villages : महाराष्ट्रातील कोट्याधीशांचं गाव ते भूतिया गाव, भारतातील 10 अनोखी गावं, परंपरा जाणून हैराण व्हाल
| Updated on: Sep 20, 2026 | 2:26 PM

India Unique Villages: भारत हा वैविध्यपूर्ण देश असून, इथं वेगवेगळ्या संस्कृती आणि परंपरा आहेत. भारतात 500 हून अधिक शहरे आणि सुमारे 10 हजार गावे आहेत. भारतातील एकूण गावांची संख्या अंदाजे 6 लाख 50 हजार गावे आहे. भारताच्या लोकसंख्येच्या सुमारे 68 टक्के लोक अजूनही गावांमध्ये राहतात. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे आणि येथील काही गावे इतकी अद्वितीय आहेत की त्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. तर या गावांमधील विचित्र परंपरा तुम्हाला चकित करतील. तर जाणून घ्या भारतातील काही गाव आणि त्यांच्या अनोख्या परंपरांबद्दल…

शनी शिंगणापूर (महाराष्ट्र) – शनी शिंगनापूर येथे घराला दरवाजे नाहीत. लोक आपल्या मौल्यवान वस्तू आणि दागिनेसुद्धा उघड्यावरच ठेवतात. असं मानलं जातं की, स्वतः शनिदेव या गावाचं रक्षण करतात. एवढंच नाही तर, येथील गावातील बँकेलाही दरवाजे नाहीत.

कोडिन्ही (केरळ) – केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यात वसलेलं हे गाव ‘जुळ्यांचे शहर’ म्हणून ओळखलं जातं. येथे अंदाजे 2 हजार कुटुंबं राहतात, त्यापैकी 400 हून अधिक कुटुंबांमध्ये जुळी मुलं आहेत. येथे इतक्या मोठ्या संख्येने जुळी मुले का जन्माला येतात, हे रहस्य शास्त्रज्ञांना अजूनही उलगडता आलेलं नाही.

कुलधारा (राजस्थान) – जैसलमेरजवळ वसलेलं हे गाव गेल्या 200 वर्षांपासून ओसाड पडलं आहे. असं म्हटलं जातं की, पालीवाल ब्राह्मणांनी आपल्या प्रतिष्ठेचं रक्षण करण्यासाठी रातोरात गाव सोडलं आणि जाताना असा शाप दिला की, येथे पुन्हा कोणीही कधीही स्थायिक होणार नाही.

मावलिनॉन्ग (मेघालय) – ‘आशियातील सर्वात स्वच्छ गाव’ असण्याचा मान या गावाला मिळाला आहे. प्रत्येक घराबाहेर बांबूच्या कचराकुंड्या ठेवलेल्या आहेत आणि गावकरी स्वतःहून स्वच्छता करतात. या गावाचे सौंदर्य आणि शिस्त कोणत्याही विकसित शहराला देखील मागे टाकते.

मत्तूर (कर्नाटक) – लहान मुलं, प्रौढ आणि अगदी दुकानदारसुद्धा अस्खलितपणे संस्कृत बोलतात. गावकरी त्यांच्या दैनंदिन संभाषणात 100 टक्के संस्कृतचा वापर करतात.

हिवरे बाजार (महाराष्ट्र) – एके काळी दुष्काळग्रस्त असलेले हे गाव आता भारतातील सर्वात श्रीमंत गावांपैकी एक बनले आहे. येथील 1 हजार 200 रहिवाशांपैकी 60 हून अधिक जण लक्षाधीश आहेत. गावकऱ्यांनी जलसंधारण आणि आधुनिक शेतीच्या माध्यमातून आपले नशीब पालटले आहे.

मलाना (हिमाचल) – हिमाचल प्रदेशातील ‘मलाना’ गाव स्वतःला जगातील सर्वात जुनी लोकशाही मानते आणि येथील लोक बाहेरच्यांना त्यांच्या वस्तूंना स्पर्शही करू देत नाहीत.

शेतफळ, (महाराष्ट्र) – हे गाव सापांचं गाव म्हणून ओळखलं जातं. गावातील प्रत्येक कुटुंबात एक साप सदस्याप्रमाणे राहतो. हे गाव जगभरात ‘सापांचे गाव’ म्हणून ओळखले जाते. येथे साप घरांमध्ये, स्वयंपाकघरात आणि अगदी मुलांच्या पाळण्यांभोवतीही मुक्तपणे फिरतात.

पुन्सारी, (गुजरात) – हे पहिलं स्मार्ट गाव आहे. गुजरातच्या साबरकांठा जिल्ह्यात वसलेल्या पुंसारी गावाला भारताचे ‘पहिले स्मार्ट गाव’ म्हटले जाते. संपूर्ण गावात हाय-स्पीड वाय-फाय उपलब्ध आहे. प्रत्येक मुख्य चौकात आणि शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत, ज्यांचे निरीक्षण ग्रामपंचायत कार्यालयाकडून केले जाते.

कोरलाई गाव (रायगड, महाराष्ट्र) – हे एकमेव असं गाव आहे जिथे सर्व गावकरी पोर्तुगीज भाषा बोलतात. गावकरी पोर्तुगीज आणि स्थानिक मराठी यांचे मिश्रण असलेली ‘कृस्ती’ नावाची एक अनोखी भाषाही बोलतात.

 

 

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us