
अंडी खाणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. लहान मुलांपासून मोठ्या माणसांना देखील अंडी प्रचंड आवडतात. पण आतापर्यंत आपण खात असलेली अंडी आरोग्यास किती लाभदायक आहेत, हे आपल्याला माहिती नव्हतं. कारण ती अंडी किती दिवसांपासून साठवण्यात आली आहेत हे आपल्याला माहिती नसायचं. याच कारणामुळे पशुसंवर्धन विभाग आणि अन्न सुरक्षा विभागाने नवीन निर्देश जारी केले आहेत, आता विक्रेत्यांनी प्रत्येक अंड्यावर एक्सपायरी डेट लिाहावी लागणार आहे. उत्तर प्रदेश सरकारने ग्राहकांच्या आरोग्याचं महत्त्व लक्षात घेत मोठा निर्णय घेतला आहे. 1 एप्रिलपासून राज्यात प्रत्येक अंड्यावर उत्पादनाची अंतिम तारीख आणि एक्सपायरी डेट छापणं बंधनकारक असेल. याचा अर्थ असा की, दुकानदारांना आता जुनी किंवा खराब झालेली अंडी ‘ताजी’ म्हणून विकता येणार नाहीत.
मुख्य पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंड्यांचा थेट संबंध मानवी आरोग्याशी आहे. पूर्वी अनेक ठिकाणी शिळी अंडी विकली जात असत आणि ग्राहकांना याची कल्पना नसायची. आता हा नियम लागू झाल्यामुळे पारदर्शकता येईल आणि लोकांना सुरक्षित अंडी उपलब्ध होतील.
सामान्य तापमान म्हणजे 30 डिग्री सेल्सियसवर अंडी फक्त 2 आठवडे खाण्या योग्य राहू शकतात… जर तुम्ही अंडी थंड वातावरणात म्हणजे 2 ते 8 डिग्री सेल्सियसवर ठेऊ शकत असाल तर, अंडी 5 आठवडे खाण्या योग्य राहू शकतात… पण अनेक दुकानदार अंड्यांची योग्य साठवणूक करत नाहीत… त्यामुळे ग्राहकांना आता तारीख बघून अंडी खरेदी करता येणार आहेत.
जर कोणत्याही व्यापाऱ्याने किंवा दुकानदाराने नियमांचे उल्लंघन केल्यास, त्यांची अंडी जप्त केली जातील. नाहीतर ती नष्ट केली जातील किंवा मानवी सेवनासाठी असुरक्षित असल्याचे स्पष्टपणे चिन्हांकित केली जातील. यावर विभाग कठोर चौकशी करून कारवाई करेल.
पूर्वी ग्राहकांना अंदाज बांधावा लागत होता की, अंडी किती जुनी आहे. जुनी अंडी खाल्ल्यामुळे अनेकांच्या आरोग्याचं नुसकान देखील झालेलं आहे… त्यामुळे ग्राहक आता अंड्यावर असलेली एक्सपायरी डेट पाहून अंडी खरेदी करु शकतील… हा नियम लवकरच राज्यभरात कडकपणे लागू केला जाईल. दुकानदारांना आणि उत्पादकांना आगाऊ तयारी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील अन्नसुरक्षा मजबूत करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे.