वाढत्या उष्णतेचा धोका: आरोग्यावर होणाऱ्या गंभीर परिणामांची लक्षणे, रिपोर्टमध्ये दिलाय मोठा इशारा
उकाडा दिवसागणिक वाढत आहे... पर्यावरणात सतत होणाऱ्या बदलांचे परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत. अशात येत्या काही वर्षात कशी परिस्थिती आहे... याबद्दल चिंता व्यक्त करणं आणि त्यावर उपाययोजना करणं फार महत्त्वाचं आहे... तर रिपोर्टमध्ये तज्ज्ञांनी काय सांगितलं आहे. जाणून घ्या...

वाढत्या तापमानामुळे केवळ पर्यावरणालाच नव्हे, तर मानवी जीवनालाही गंभीर धोका निर्माण होत आहे. दुपारचा प्रवास असेल तर, डोक्यावर सूर्य असतो. अशात अनेक नवीन आजार डोकं वर काढतात. पण जर वेळेवर योग्य उपाययोजना केल्या नाहीत, तर भविष्यात ही समस्या अधिक गंभीर होऊ शकते. निरोगी जीवनशैलीसोबतच पर्यावरणाचे संरक्षण करणेही तितकेच महत्त्वाचे झाले आहे. सांगायचं झालं तर, वाढत्या उष्णतेमुळे लोकांच्या दैनंदिन जीवनशैलीत मोठा बदल होत आहे. विशेषतः, जास्त तापमान आणि आर्द्रतेमुळे लोक व्यायामासाठी बाहेर जाणे टाळत आहेत. अनेक भागांमध्ये परिस्थिती अशी होऊ शकते की लोकांना चालणे किंवा अगदी हलका व्यायाम करणेही कठीण होईल. अंदाजानुसार, 2030 पर्यंत लोकांची शारीरिक हालचाल सुमारे 15 टक्क्यांनी कमी होऊ शकते.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO), 18 ते 64 वयोगटातील व्यक्तींना दर आठवड्याला किमान 150 मिनिटे मध्यम तीव्रतेचा व्यायाम किंवा 75 मिनिटे तीव्र तीव्रतेचा व्यायाम करणे आवश्यक आहे. परंतु सध्याची परिस्थिती अशी आहे की, जगभरातील दर तीन व्यक्तींपैकी एक व्यक्ती शारीरिक हलचाल करत नाही. वाढत्या तापमानामुळे ही समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.
जेव्हा लोक कमी व्यायाम करतात, तेव्हा हृदयरोग, मधुमेह आणि इतर चयापचय विकारांचा धोका वाढतो. हे सर्व आजार दीर्घकाळात मृत्यूचे प्रमुख कारण ठरू शकतात. याव्यतिरिक्त, उच्च तापमानामुळे उष्माघात आणि निर्जलीकरण यांसारख्या तात्काळ समस्या देखील वाढत आहेत. हे दोन्ही घटक एकत्रितपणे भविष्यात मृत्यूदर वाढवू शकतात.
या अभ्यासात “अतिरिक्त मृत्यू” असा उल्लेख आहे. जर उष्णतेमुळे सामान्यतः होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत वाढ झाली, तर तो एक अतिरिक्त मृत्यू मानला जातो. उदाहरणार्थ, जर एका वर्षात 20 लाख लोकांचा मृत्यू होत असेल आणि उष्णतेमुळे ही संख्या वाढून 22 लाख झाली, तर अतिरिक्त 20 लाख मृत्यू हे उष्णता आणि तिच्या परिणामांमुळे झाले असे मानले जाईल.
या अभ्यासानुसार, 2050 पर्यंत शारीरिक हालचालींच्या अभावामुळे भारतातील मृत्युदरात लक्षणीय वाढ होऊ शकते. असा अंदाज आहे की, दर 1 लाख लोकांमागे सुमारे 10.62cलोकांचा मृत्यू या कारणामुळे होऊ शकतो. ही आकडेवारी भविष्यासाठी एक चिंताजनक संकेत देते.
वाढत्या उष्णतेतही लोकांना सुरक्षितपणे व्यायाम करता यावा यासाठी विशेष मार्गदर्शक तत्त्वे तयार करणे आवश्यक आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. सकाळी लवकर किंवा संध्याकाळी व्यायाम करणे, पुरेसे पाणी पिणे आणि उष्णता टाळण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासोबतच, हवामान बदलावर नियंत्रण ठेवण्यासाठी जागतिक स्तरावरही प्रयत्न करणे गरजेचे आहे.
