
Stress Management : धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि स्पर्धेच्या जगात तणावाचं प्रमाण वाढू लागले आहे. ही आता सामान्य समस्या झाली आहे. ज्याचा प्रत्येक चौथा व्यक्ती सामना करत आहे. पण हे हलक्यात घेऊ नका. कारण हे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. लोकं आता तणावाविषयी खुलेपणाने बोलत आहेत आणि समाजात त्याबद्दल जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहेत.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की आपण सुरुवातीपासूनच तणाव आणि चिंता यांना गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. आपण तणाव आणि चिंता टाळण्यासाठी आणि त्यावर मात करण्यासाठी काही टिप्स जाणून घेणार आहोत.
तणाव आणि चिंता टाळण्यासाठी सर्वप्रथम रोज व्यायाम करण्याची सवय लावा. यामुळे आनंदी हार्मोन्स शरीरात सोडले जातात, ज्यामुळे मूड सुधारतो आणि मानसिक तणाव दूर होतो. यासाठी श्वासोच्छवासाचे व्यायाम देखील फायदेशीर मानले जातात. त्यामुळे रोज सकाळी किमान अर्धा तास झुंबा, एरोबिक्स, योगासने यांसारखी तुमची आवडती कसरत करा.
पुरेशी झोप होत नसेल तर याचा परिणाम तुमच्या मूड आणि एनर्जी लेव्हलवर होतो. तणावामुळे रोज नीट झोपत नसाल तर त्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. तणाव दूर करण्यासाठी चांगली झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे.
जंक फूड पासून लांब राहिले पाहिजे. कारण आहार चांगला नसेल तर विकार होतो असे म्हटले जाते. आपण जे खातो त्याचा आपल्यावर थेट परिणाम होत असतो. त्यामुळे पोषक आहार घ्या. फळांचा आहारात समावेश करा. धान्य, भाज्या, प्रथिनेयुक्त आहारावर भर द्या.
कॉम्प्युटरवर काम करणे असो, किंवा टीव्ही पाहणे असो किंवा मग मोबाईल पाहणे असो. यावर मर्यादा आणली पाहिजे. याचा तुमच्या आरोग्यावर थेट परिणाम होतो. स्क्रीनची वेळ कमी करण्यासाठी प्रयत्न करा.
जर तुम्हाला कॉफी किंवा चहा पिण्याची सवय असेल तर ती आजपासूनच कमी करा. चहा पिल्याने ताण कमी होतो असे अनेकांना वाटते. पण प्रत्यक्षात तसे होत नाही. कॅफीन तुमच्या मानसिक आरोग्यावर आणखी परिणाम करते, ज्यामुळे तणाव आणि चिंतेची लक्षणे तीव्र होऊ शकतात.