
दही अनेकांना आवडते, परंतु पावसाळ्यातील थंड वातावरणामुळे दही खाल्ल्याने कधीकधी आजारी पडण्याची शक्यता असते. त्यामुळे या ऋतूत दही केव्हा खावे आणि त्यात मीठ की साखर घालणे अधिक फायदेशीर आहे, याबाबत सविस्तर माहिती घेऊया.

काही लोक दह्यात साखर किंवा खडीसाखर घालून ते गोड करतात, तर काही जण चव वाढवण्यासाठी जिरे पावडर, काळे मीठ किंवा सॅलडसह दही खातात. काहीजण वर्षभर मीठ घालून दही खाणे पसंत करतात, पण ही सवय आरोग्यासाठी योग्य आहे का?

आहारतज्ञांच्या मते, दह्यात साखर किंवा खडीसाखर घालून खाणे अधिक फायदेशीर आहे. गूळ घातलेले दही हा देखील एक आरोग्यदायी पर्याय आहे. याउलट, मीठ घालून दही खाणे शक्यतो टाळावे. जर तुम्हाला मीठ घालायचेच असेल, तर जेवणासोबत थोडे काळे मीठ किंवा खडे मीठ चवीपुरते वापरावे.

तज्ञांच्या मते, दह्यात मीठ घालून ते जास्त काळ ठेवल्यास त्यातील लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरियावर नकारात्मक परिणाम होतो, ज्यामुळे दह्याचे आरोग्यदायी फायदे कमी होतात. याशिवाय, संधिवात, दमा, सांधेदुखी, मूत्रपिंडाचे विकार किंवा सर्दी यासारख्या आजारांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तींनी दही खाणे टाळावे.

पावसाळ्यात पचनसंस्था तुलनेने कमकुवत असते, त्यामुळे दही खाणे पूर्णपणे थांबवावे किंवा मर्यादित प्रमाणात खावे. विशेषतः रात्री दही खाल्ल्याने त्रास होतो. जसे की पोटात गॅस, पोट फुगणे किंवा जडपणा यासारख्या समस्या उद्भवू शकतात. मात्र, योग्य वेळी, योग्य पद्धतीने आणि मर्यादित प्रमाणात खाल्लेले दही शरीरासाठी फायदेशीर ठरते.