जगण्याच्या संघर्षाची उत्तुंग ऊर्जा, धडधाकटांनाही लाजवणारा उत्साह, 55 दिव्यांगांनी कळसुबाईवर फडकवला तिरंगा!

| Updated on: Jan 04, 2022 | 6:30 AM

राज्यातील तब्बल 55 दिव्यांगांनी कळसुबाई शिखरावर स्वारी करत भारताचा तिरंगा तिथं फडकवला. आपल्यातील उणीवांवर मात करत शिखरावर पोहोचून नव्या वर्षाचे स्वागत त्यांनी तिरंगा फडकावून केले.

जगण्याच्या संघर्षाची उत्तुंग ऊर्जा, धडधाकटांनाही लाजवणारा उत्साह, 55 दिव्यांगांनी कळसुबाईवर फडकवला तिरंगा!
विजयी जल्लोष साजरा करताना धाडसी गिर्यारोहकांची टीम
Follow us on

औरंगाबादः सह्याद्रीच्या पर्वतरांगांतील कळसुबाई शिखर. 1648 मीटर उंचीचे हे महाराष्ट्रातील एव्हरेस्ट शिखर समजले जाते. हे शिखर सर करायचं म्हटलं तर धडधाकट माणसांनाही घाम फुटतो. त्यात आपल्या शरीराचा एखादा अवयव साथ देत नसेल तर कुणी तिथवर जाण्याची हिंमतही करत नाही. पण राज्यातील तब्बल 55 दिव्यांगांनी कळसुबाई शिखरावर स्वारी करत भारताचा तिरंगा तिथं फडकवला. 31 डिसेंबर रोजी त्यांनी ही अभिमानास्पद कामगिरी केली. यात औरंगाबादसह राज्यभरातील इतरही जिल्ह्यांतील  दिव्यांग सहभागी झाले होते. कुणी पायांनी अधू होते तर कुणी हाताने. कुणाचे तर दोन्हीही पाय नाही. पण आपले हे वैशिष्ट्य जपत, या उणीवेवर मात करत नव वर्षातील पहिल्या सुर्याचे स्वागत करण्यासाठी ही टीम सज्ज झाली. नुसताच निर्धार नाही केला तर 31 डिसेंबरला स्वारी कळसुबाई शिखराच्या दिशेने निघाली आणि संध्याकाळी 7 वाजता तिथे पोहोचली. 1 जानेवारीच्या सुर्याला तिरंगा फडकावून सलामी दिली.

नववर्षाच्या सूर्याचे स्वागत सर्वोच्च शिखरावर

31 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता या टीमने चढाईला सुरुवात केली. एकमेकांना आधार देत संध्याकाळी 7 वाजता शिखर गाठले. शिखरावरील विहिरीजवळ कापडी तंबूत मुक्काम केला. यावेळी कडाक्याची थंडी होती. पण या जिगरबाजांनी तिथे रात्र काढली आणि 1 जानेवारी रोजी नव्या वर्षाच्या सूर्याचे स्वागत तिरंगा फडकावून केले. त्या दिवशी सकाळी 9 वाजता शिखर उतरण्यास सुरुवात केली आणि दुपारी कळसुबाई माची मंदिराजवळ शिखराची माहिती देणाऱ्या फलकाचे उद्घाटन बीड येथील डॉ. अनिल बारकुल यांच्या हस्ते करण्यात आले.

राज्यातील 55 दिव्यांगांची कामगिरी

राज्यातील सर्व प्रकारच्या दिव्यांगांना एकत्र येऊन शिवुर्जा प्रतिष्ठान ही संस्था दरवर्षी कळसुबाई शिखरावर 31 डिसेंबर रोजी ऊर्जा मोहिमेचे आयोजन करते. कळसुबाई शिखरावरील या मोहिमेचे हे सलग दहावे वर्ष होते. बीड, पुणे, अकोला, औरंगाबाद, सोलापूर, सांगली, अहमदनगर नाशिक, मुंबई, ठाणे, जालना इत्यादी जिल्ह्यातून 55 दिव्यांग सहभागी झाले होते. सात महिलासह अति तीव्र बहुविकलांग मतिमंद अंध व गुडघ्यापासून पाय नसलेले अनेक दिव्यांगांनी कळसुबाई शिखर यशस्वी सर केले. सर्वोच्च शिखरावर भागिनाथ मराडे यांच्या कळसुबाई मित्र मंडळाच्या वतीने दिव्यांगांचा सत्कार करण्यात आला.

कळसुबाई शिखर सर करणारे जाँबाज कोण कोण?

शिवुर्जा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी गाडे, सचिव कचरू चांभारे बीड, डॉ.अनिल बारकुल बीड, धर्मेंद्र सातव पुणे, अंजली प्रधान नाशिक, सुरेखा ढवळे पुणे, जनार्दन पानमंद रायगड, डॉक्टर सुनीता बारकुल , केशव भांगरे अकोले, मच्छिंद्र थोरात शिरूर, लक्ष्मण वाघे सोलापूर, सागर बोडखे नाशिक, जीवन टोपे खेड , सतिश आळकुटे पुणे, जगन्नाथ चौरे ठाणे, सागर बंचारे औरंगाबाद, अशोक रोडे पैठण, डॉ.सुरज बटुले पैठण, अमोल शिंदे परतूर, शबाना पखालीआजाद, काजल कांबळे सांगली, तुकाराम कदम उस्मानाबाद, हर्ष बाबर पुणे, ओम तारू,पार्थ चौधरी कल्याण, सचिन मानकर , सुनील वानखेडे अकोला, आदित्य निकुंभ कोपरगाव, धन्यवान घोलप मोहोळ, पुनम गंगाधर सांगली, विवेक गुंड मोहोळ, संदीप राऊत वैजापूर, गणेश गंगावणे औरंगाबाद, इनायत शेख आडुळ सह 55 दिव्यांगांनी या मोहिमेत भाग घेतला होता.

इतर बातम्या-

आमदार नितेश राणेंची अटकपूर्व जामीनासाठी उच्च न्यायालयात धाव, उद्या तातडीच्या सुनावणीची शक्यता

कल्याणमध्ये गटार झाले मोठे, घरे झाली छोटी, पावसाळ्यात चाळ्यांमध्ये पाणी तुंबणार?; एमएसआरडीचा अजब कारभार