Abhijeet Dipke : महिनाभरापासून दिल्लीत असलेल्या अभिजीत दीपकेचा मोठा निर्णय, आजच… आईनेच दिली गुड न्यूज
जंतरमंतरवरील आंदोलनानंतर कॉक्रोच जनता पार्टी, त्याचे आंदोलक तसेच या पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके खूप चर्चेत आहेत. गेल्या महिन्याभरापासू ते दिल्लीतच होते. शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर आता दीपके यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

नीट पेपरलीक प्रकरणावरून आलवाज उठवत, विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी आणि शिक्षमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन करण्यात आलं. याच आंदोलनामुळे फक्त महाराष्ट्रात किंवा देशातच नाही तर जगभरातील मीडियाने ज्याची दखल घेतल, जो चर्चेत आला तो कॉक्रोच जनता पार्टीचा (CJP) संस्थापक अभिजीत दीपके हा जवळपास महीना दीड महीना राजधानी दिल्लीत तळ ठोकून होता. विद्यार्थ्यांचं आंदोलन तीव्र झाल्यावर अखेर सरकार नमलं आणि शनिवार 25 जुलै रोजी धर्मेद्र प्रधानांनी राजीनामा दिला. या मोठ्या यशनानंतर सर्वत्र जल्लोष झाला, मात्र आजारी असूनही , टॉफॉईड होऊनही अभिजीत या आंदोलनत सतत कार्यरत होता. अखेर महिन्या -दीड महिन्याच्या कालावधीनंतर अभिजीत आता त्याच्या घरी परतणार आहे. विशेष म्हणजे आजचा दिवस खास, गुरुपौर्णिमेचा असल्यामुळे, त्याच दिवशी लाडका लेक घरी येत असल्यामुळे त्याच्या आई-वडिलांसाठी हा क्षण अधिक भावनिक ठरला आहे. आपल्या मुलाला, अभिजीतला आता केवळ मुलगा नव्हे, तर “गुरू” मानत असल्याची भावना त्याच्या पालकांनी व्यक्त केली.
“आधी आम्ही त्याचे आई-वडील होतो, आता तो आमचा गुरू झाला”
अभिजीत घरी येणार असल्याचे सांगताना त्याच्या आईच्या, अनिता यांच्या डोळ्यात चमक आणि चेहऱ्यावर हास्य विलसत होतं. ” आज खूप आनंदाचा दिवस आहे. आज गुरुपौर्णिमा आहे आणि आजच अभिजीत घरी येत आहे. हा दिवस असाच कसा निवडला गेला, हेही आम्हाला माहिती नाही. पण योगायोग खूप सुंदर आहे. आधी आम्ही त्याचे आई-वडील होतो, पण आता तो आमचा गुरू झाला आहे. विद्यार्थ्यांसाठी त्याने जे काम केलं, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ज्या पद्धतीने संघर्ष केला, त्यामुळे तो आमच्यासाठी गुरूसमान आहे” असं त्याची आई म्हणाली.
” 6 जूनला तो घरी आला होता, तेव्हा मनात खूप तणाव होता. त्याला आंदोलन करू नकोस असंही वाटत होतं, पण त्याने आपला निर्णय बदलला नाही. आज त्याच आंदोलनाला यश मिळालं आणि तो आनंदाने घरी परततोय, ही आमच्यासाठी मोठी समाधानाची बाब आहे” असंही त्यांनी पुढे सांगितलं.
घरात स्वागताची तयारी, पण मुलाच्या आवडीचा विचारही
अभिजीतच्या स्वागतासाठी घरात विशेष तयारी करण्यात आली आहे. ” आम्ही रांगोळी काढणार आहोत, फुलांनी सजावट करणार आहोत. खरं तर त्याला असा मोठा गाजावाजा आवडत नाही. पण आमच्या मनातली इच्छा म्हणून हे सगळं करत आहोत” असं त्याच्या आईने नमूद केलं.
टायफॉईडमुळे साधाच बेत
बऱ्याच दिवसांनी, अख्खा देश गाजवून मुलगा घरी येतोय. त्याच्यासाठी काय बेत, खायला काय करणार असा सवाल त्याच्या आईला विचारण्यात आला, मात्र त्या माऊलीला आपल्या लेकाच्या तब्येतीची खूप काळजी आहे. अभिजीतला नुकताच टायफॉईड झाल्याने त्याच्यासाठी कोणताही विशेष खाद्यपदार्थ बनवलेला नाही, असं त्यांनी सांगितलं. ” आज अभिजीतसाठी मुगाची खिचडी बनवणार आहोत. डॉक्टरांनी साधा आहार घ्यायला सांगितला आहे. त्याला नॉनव्हेज खूप आवडतं, पण टायफॉईडमुळे अजून एक महिना ते देता येणार नाही,” असं त्याची आई म्हणाली.
विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत तो लढत राहील
पुन्हा आंदोलनाचा इशारा देण्याबाबत विचारले असता आई म्हणा की, “जोपर्यंत विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत तो शांत बसणार नाही. गरज पडली तर पुन्हा आंदोलन करेल. आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी तो आमच्या घरी गुरू म्हणून येत आहे. आता आम्ही त्याची मुलं आणि तो आमचा गुरू झाला आहे, अशीच आमची भावना आहे.”
इतके दिवस टीव्हीवर पहायचो, आज तो प्रत्यक्ष भेटणार
त्याच्या येण्याच्या बातमीने अभिजीतचे वडील, भगवान दीपकेही खूप खुश आहेत. “तो आंदोलनानंतर पहिल्यांदाच घरी येतोय. खूप दिवस आम्ही त्याला फक्त टीव्हीवर पाहत होतो. आज तो प्रत्यक्ष घरी येतोय, याचा खूप आनंद आहे. मधला काळ आमच्यासाठी अत्यंत कठीण होता” असं ते म्हणाले. “अभिजीतच्या आंदोलनामुळे हा लढा संपूर्ण भारतभर पोहोचला. सकाळपासून रात्रीपर्यंत अनेक लोक आम्हाला फोन करून शुभेच्छा देत आहेत. आई-वडील म्हणून आमचाही सन्मान होत आहे” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
“त्याच्या स्वागतासाठी फुलांची तयारी केली आहे. पंचारतीने त्याचे औक्षण करणार आहोत. माझी इच्छा होती की डीजे लावावा, पण त्याला अशा गोष्टी आवडत नाहीत. त्यामुळे आम्ही साधेपणाने त्याचं स्वागत करणार आहोत.” असंही त्यांनी नमूद केलं. “अभिजीतच्या आंदोलनाला देशभरातील विद्यार्थ्यांचा मोठा पाठिंबा मिळाला आहे. विविध राजकीय पक्षांतील नेत्यांनीही त्याला समर्थन दिलं. पुढे काय निर्णय घ्यायचा, हे आता तोच ठरवेल” असं भगवान दीपके म्हणाले.
घरचा अभिजीत आणि स्टेजवरील अभिजीत पूर्णपणे वेगळा
अभिजीतच्या स्वभावाबाबत बोलताना भगवान दिपके म्हणाले, “स्टेजवर दिसणारा अभिजीत आणि घरातला अभिजीत यात खूप फरक आहे. घरी तो फारसा बोलायचाही नाही. त्याने आपल्या भावना कधी आक्रमकपणे व्यक्त केल्या नव्हत्या. त्याच्यात इतका मोठा बदल कसा झाला, हे आम्हालाही समजले नाही.” तर आताचा अभिजीत आणि पूर्वीचा अभिजीत यात खूप मोठा फरक आहे. तो लहानपणापासून खूप शांत स्वभावाचा होता. तो इतका प्रभावी बोलतो, लोकांना प्रेरित करतो, हे आम्हीही त्याचे व्हिडिओ पाहिल्यानंतरच अनुभवलं. विद्यार्थ्यांसाठी त्याने उभा केलेला संघर्ष पाहून आम्हालाही त्याचा अभिमान वाटतो,” असं त्याच्या आईने सांगितलं.