आता मनात एकच इच्छा, घरी जाऊन… अभिजीत दिपकेंनी मनांतलं बोलून दाखवलं!
Abhijit Dipke : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके 40 दिवसांनंतर छत्रपती संभाजीनगर येथील घरी परतले. यावेळी त्यांनी आईच्या हातचं जेवण करणार असल्याची माहिती दिली.

दिल्लीतील यशस्वी आंदोलनानंतर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके 40 दिवसांनंतर छत्रपती संभाजीनगर येथील घरी परतले. संभाजीनगरमध्ये आल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी दिपके यांनी केंद्र सरकारवर विविध मुद्द्यांवरून जोरदार टीका केली. घरी आल्यावर आता काय करणार यावर बोलताना दिपके यांनी आता सर्वप्रथम शांत झोप घेणार आणि आईच्या हातचे जेवण आवडीने खाणार असं विधान केले. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
कायद्याची अंमलबजावणी महत्त्वाची
छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी बोलताना अभिजीत दिपके म्हणाले की, सरकार कितीही नवे कायदे बनवले तरी ते प्रामाणिकपणे राबवणारे अधिकारी नसतील तर त्या कायद्यांचा कोणताही परिणाम होणार नाही. केवळ कायदा करणे हा उपाय नसून त्याची प्रभावी अंमलबजावणी होणे तितकेच महत्त्वाचे आहे. पेपर लीक प्रकरणांच्या सुनावणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या फास्ट ट्रॅक कोर्टचे उदाहरण देत त्यांनी सांगितले की, पहिल्याच सुनावणीला केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) चे अधिकारी न्यायालयात उपस्थित नसल्यामुळे सुनावणी पुढे ढकलावी लागली. यावरून केवळ कायदे बनवून व्यवस्था बदलत नाही, तर त्यांची अंमलबजावणी करण्याची इच्छाशक्तीही आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.
पंतप्रधान मोदींवर टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना दिपके म्हणाले की, ‘मोदींनी पंतप्रधानपद सोडून एक चांगले इन्फ्लुएन्सर म्हणून काम करावे आणि दुसऱ्या व्यक्तीला देशाचे नेतृत्व करण्याची संधी द्यावी. देशाला अशा व्यवस्थेची गरज आहे जिथे निर्णयांचा परिणाम प्रत्यक्ष जमिनीवर दिसून येईल.’
युवकांना त्रास दिल्यास पुन्हा मोठे आंदोलन
अभिजीत दिपके यांनी आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थी आणि युवकांना पोलिसांकडून त्रास दिला गेला, तर पुन्हा मोठे आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही दिला. युवकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला लोकशाही मार्गाने उत्तर दिले जाईल. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतरही सरकारविरोधातील युवकांचा संताप कमी झालेला नाही. येत्या काळात याहून मोठे आंदोलन उभे राहू शकते, कारण विद्यार्थी आणि युवक सातत्याने आपल्या प्रश्नांवर आवाज उठवत आहेत असं दिपके म्हणाले.