सांगली : जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातील केरेवाडी फाट्याजवळ वारकऱ्यांच्या दिंडीमध्ये पिकअप व्हॅन (Pickup Van) घुसल्यानं मोठा अपघात (Accident) झालाय. आषाढी एकादशीसाठी हे वारकरी पंढरपूरच्या दिशेनं पायी निघाले होते. त्यावेळी केरेवाडी फाट्याजवळ अचानक एक पिकअप व्हॅन दिंडीत घुसली. या अपघातात 12 वारकरी गंभीर जखमी (Seriously injured) झाले आहेत. जखमींना कवठे महांकाळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं. त्यातील गंभीर जखमींना आता मिरजच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.
कोल्हापूर जिल्ह्यातील भादोले आणि लाहोटे येथील वारकरी आळंदीला वारीसाठी जात असताना साताऱ्यातील शिरवळ नजीक 19 जून रोजी भीषण अपघात झाला होता. ट्रॉलीमध्ये एकूण 43 वारकरी होते. या अपघातात 30 वारकरी गंभीर जखमी, तर 11 जण किरकोळ जखमी झाले होते. यात एका वारकऱ्याचा मृत्यू झाला होता. आयशर टेम्पो पुण्याकडे भरधाव वेगाने जात असताना चालकाचा ताबा सुटला आणि टेम्पोने विद्युत पोलला धडक दिली. त्यानंतर ट्रॉलीमधून आळंदीकडे निघालेल्या वारकऱ्यांना या टेम्पोने धडक दिली. सर्व वारकरी झोपेत असताना ही भीषण अपघात घडला. जखमींवर शिरवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र व डॉ.जोगळेकर हाँस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले.
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीने आज नातेपुतेहून पुढे मार्गक्रमण केलं. माऊलांची पालखी आज माळशिरसला मुक्कामी असेल. तत्पूर्वी पुरंदवडे येथे पालखीचं पहिलं गोल रिंगण पार पडलं.
तर तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील तिसरं गोल रिंगण अकलूज शहरातील सदाशिवराव माने शाळेच्या प्रांगणात पार पडलं. अकलूजमध्ये पोहोचल्यानंतर काँग्रेस नेते नाना पटोलेही पालखी सोहळ्यात सहभागी झाले. डोक्यावर पांढरी टोपी, कपाळावर अष्टगंध आणि बुक्का, गळ्यात टाळ अशा वारकऱ्याच्या खास पेहरावात पटोले पालखी सोहळ्यात सहभागी झाले. माळशिरसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी तुकाराम महाराजांच्या पादुकांचं नीरा स्नान संपन्न झालं.