EXCLUSIVE : तब्बल 9 हजार एकर जागा उपलब्ध, नाणार रिफायनरीला पर्याय सापडला?

| Updated on: Mar 13, 2021 | 1:11 PM

रिफायनरी प्रकल्प नाणारमध्ये होणार नाही, पण त्या प्रकल्पाला रिफायनरी प्रकल्प होणार, असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा प्रकल्प नाणार ऐवजी इतरत्र होण्याचे संकेत दिले होते. (After Nanar, refinery to be shifted to Raigad or ratnagiri?)

EXCLUSIVE : तब्बल 9 हजार एकर जागा उपलब्ध, नाणार रिफायनरीला पर्याय सापडला?
नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्प
Follow us on

मुंबई: रिफायनरी प्रकल्प नाणारमध्ये होणार नाही, (Nanar refinery) पण त्या प्रकल्पाला रिफायनरी प्रकल्प होणार, असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी हा प्रकल्प नाणार ऐवजी इतरत्र होण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार एमआयडीसीने या प्रकल्पासाठी रायगड आणि रत्नागिरीत दोन जागांची पाहणी केली असून त्याचा अहवाल लवकरच मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे. त्यामुळे हा रिफायनरी प्रकल्प कोकणातच होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. (After Nanar, refinery to be shifted to Raigad or ratnagiri?)

या दोन्ही ठिकाणी 9 हजार एकर जागा उपलब्ध आहे. या ठिकाणी प्रकल्पासाठी आणखी जागा उपलब्ध होऊ शकते. जागेची इथं काहीच समस्या येणार नाही. या दोन्ही जागांचा अहवाल एमआयडीसी लवकरच राज्य सरकारला सादर करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाणार प्रकल्पाला पाठिंबा दिला होता. त्यामुळे नाणार प्रकल्पावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. तर काँग्रेस नेते आशिष देशमुख आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हा प्रकल्प विदर्भात नेण्याची मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हा प्रकल्प नाणारमध्ये होणार नाही, पण या प्रकल्पाला नाणार प्रकल्प म्हणून नका असं म्हटलं होतं. या घटना घडत असतानाच एमआयडीसीने या प्रकल्पासाठी कोकणात आणखी दोन जागांची पाहणी केली आहे. रायगड तालुक्यातील तळा आणि रत्नागिरी तालुक्यातील जयगड या त्या दोन जागा आहे. दोन्ही जागा 9 हजार एकरच्या असून या दोन्ही जागांचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करण्यता येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. तीन लाख कोटी रुपयांच्या या प्रकल्पांसाठी नव्या दोन जागांचा पर्याय निर्माण करण्यात आला असून त्याबाबत केंद्र आणि राज्य सरकार काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मुख्यमंत्री काय म्हणाले होते?

आम्ही बांधिल आमच्या जनतेला आहोत. त्याच्यामुळे तिथल्या जनतेचा त्या प्रकल्पाला विरोध आहे. परंतु जेव्हा आम्ही विरोध करत होतो, तेव्हा तिथल्या जनतेच्या मताशी सहमत होऊनच विरोध करत होतो. नाणार व्यतिरिक्त ठरवलेल्या जागेचा स्थानिक लोक स्वागत करत असतील तर आमचा त्याला विरोध नाही. पण ही रिफायनरी नाणारला होणार नाही हा निर्णय झालेला आहे. त्यांना आणि स्थानिक जनतेला मंजूर असेल तर पर्यायी जागी प्रकल्प होईल. त्यामुळेच त्या प्रकल्पाला आता नाणार म्हणू नका रिफायनरी म्हणा, असंही उद्धव ठाकरे म्हणाले होते.

नाणार रिफायनरी प्रकल्प नेमका काय होता?

कोकणातील निसर्गसंपन्न अशा रत्नागिरी-सिंधुदुर्गाच्या सीमेवर नाणार तेलशुद्धीकरण (रिफायनरी) प्रकल्प प्रस्तावित होता. रत्नागिरीतील राजापूर तालुक्यातील 14 गावं आणि सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यातील 2 गावांमध्ये प्रकल्पाचा विस्तार होणार होता. 13000 एकरावर हा प्रकल्प उभारला जाणार होता. नागरिकांचा विरोध असतानाही, या गावांमधील क्षेत्र 18 मे 2017 रोजी आद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलं. हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या तीन सरकारी कंपन्या नाणार रिफायनरी प्रकल्प उभारत असून, त्यांची संयुक्तपणे रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल लिमिटेड म्हणजेच RRPCL कंपनी 22 सप्टेंबर 2017 रोजी स्थापन करण्यात आली.

काही महिन्यांपूर्वीच सौदी अरेबियाच्या अरामको कंपनीशी नाणार रिफायनरीबाबत करार झाला. नाणार रिफायनरीच्या उभारणीला तीन लाख कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. आशियातील सर्वात मोठा रिफायनरी प्रकल्प असल्याचे सांगण्यात येत असून, 2023 पर्यंत हा प्रकल्प कार्यन्वित करण्याचा सरकारचा विचार आहे. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे, प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्पापासून अवघ्या 15-16 किलोमीटरच्या अंतरावर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प आहे. (After Nanar, refinery to be shifted to Raigad or ratnagiri?)

 

संबंधित बातम्या:

‘त्या’ प्रकल्पाला नाणार म्हणू नका, रिफायनरी म्हणा; नाणार रिफायनरीला उद्धव ठाकरेंचा विरोध कायम

नाणार प्रकल्प अखेर रद्द, मुख्यमंत्र्यांची फाईलवर अखेरची सही   

एकच जिद्द रिफायनरी रद्द, नाणारवासियांचा निर्धार 

(After Nanar, refinery to be shifted to Raigad or ratnagiri?)