
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात अखेर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला आहे. वैयक्तिक कारणांमुळे मी स्वेच्छेने राजीनामा देत आहे असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे. काल त्यांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सोपवला. सध्या सगळ्या राज्यात भोंदूबाबा अशोक खरात याच्या कारनाम्यांची चर्चा आहे. कोट्यावधीची संपत्ती जमवल्यासह महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा या भोंदूबाबा अशोक खरातवर आरोप आहे. रुपाली चाकणकर यांचे भोंदू अशोक खरात याच्यासोबतचे काही फोटो, व्हिडीओ समोर आल्यावर त्यांच्यावर चहूबाजूंनी टीकेची झोड उठली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षाच अशा प्रकारे तंत्र-मंत्र आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालत असल्याचं दिसून आलं. त्याशिवाय अशोक खरातला पाठिशी घालण्याचा आरोपही त्यांच्यावर झाला.
रुपाली चाकणकर यांनी राजकीय कारकिर्द या प्रकरणामुळे अडचणीत आली आहे. या खडतर काळात पुणे काँग्रेसमधील नेते अरविंद शिंदे यांनी रुपाली चाकणकर यांना पाठिंबा दिला आहे. “नाशिकच्या खरातच जे प्रकरण आम्हाला दिसतय. त्यामध्ये खरातवर कारवाई झाली पाहिजे. अशा व्यक्तीला बाहेर सोडलाच नाही पाहिजे ही आमची पहिली भूमिका आहे. पण खरातला बाजूला ठेऊन रुपाली चाकणकर यांच्यावर जो निशाणा साधला जातोय. यात स्पष्टपणे राजकीय गणित दिसत आहेत” असं अरविंद शिंदे म्हणाले.
पोलीस डोळे बंद करुन होते का?
“रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना दखल घेतली नसेल, कामात कुचराई केली असेल तर त्यावर बोलले पाहिजे. ज्यावेळेला तक्रारी दाखल झाल्या, त्यावेळी बोललं पाहिजे होतं. आज खरातला जे धरलं आहे. खरातचं जे षडयंत्र चालू आहे, पोलीस डोळे बंद करुन होते का?” असा सवाल अरविंद शिंदे यांनी विचारला आहे.
खरात चुकीचा असेल कडक कारवाई करा
“नाशिकमध्ये खरात विरोधात पोलीस तक्रार दाखल झाल्यानंतर त्यावेळी पोलिसांनी, एलआयबी, साीआयडीने काही केलं नाही. म्हणून यात राजकारण करु नका. खरात चुकीचा असेल कडक कारवाई करा. रुपाली चाकणकर त्यांच्या कार्यकाळात कुणाला राजकारणात अशा पद्धतीने बदनाम करुन राजकारणत उठवू नये अशी आमची भूमिका आहे” असं अरविंद शिंदे म्हणाले.
त्यावेळी गप्प का बसले?
“आरोप आहे तथ्य नाही. आरोप ज्यावेळी आपण करतो तक्रार दाखल झाली त्यांनी त्यावर कारवाई केली नाही. मग त्यावेळी आंदोलन का नाही केलं?. त्यावेळी पत्रकार परिषद का नाही घेतली? त्यावेळी गप्प का बसले? खरे सूत्रधार पोलीस खातं आहे. कोट्यवधीच्या जमिनी खरेदी केल्याचे सातबारे आम्ही पाहिले. पोलीस खातं, महसूल खातं सगळे गप्प आहेत” अशी टीका अरविंद शिंदे यांनी केली.