‘या सरकारचे शंभर अपराध झाल्यानंतर…,’ काय म्हणाले अंबादास दानवे ?

वेगळा विदर्भ होऊच शकत नाही. हा मराठी माणसाचा अखंड महाराष्ट्र असाच कायम राहणार आहे, असेही अंबादास दानवे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटले आहे.

या सरकारचे शंभर अपराध झाल्यानंतर..., काय म्हणाले अंबादास दानवे ?
Ambadas Danve
| Updated on: Jul 26, 2026 | 4:37 PM

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा तर होणारच होता. देशभरात तरुणाई आणि विद्यार्थ्यांचा जो रोष होता. जर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला नसता तर हा रोष आणखी वरपर्यंत गेला असता, राजीनामा मागणं हे योग्य होतं आणि त्यांनी राजीनामा दिला, हेही योग्य झालं असल्याचे ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. नीट पेपर फुटीच्या प्रकरणात दंड ठोठावण्यापेक्षा पेपरफुटी होऊ नये, याचा बंदोबस्त करणे हे मला महत्त्वाचे वाटते. शंभर अपराधांनंतर श्रीकृष्णांनी सुदर्शन चक्र वापरलं होतं. तसं या सरकारचे शंभर अपराध झाल्यानंतर आता या तरुणाईने सुदर्शन चक्र वापरलं आहे, असं मला वाटतं असेही अंबादास दानवे म्हणाले आहेत.

अन्यथा हे भस्मसात झाले असते

धर्मेद्र प्रधान यांच्या मागे भाजपचा परिवार उभा राहिला आहे याबद्दल विचारले असता अंबादास दानवे म्हणाले की भाजपाचा परिवार बोगसच आहे. सगळाच करप्ट आहे. त्यामुळे तो असला तरी काही फरक पडणार नाही. महिना-दोन महिन्यांनी कळेल भाजपाचा परिवार आहे की नाही. त्यांनी देशाचं हित बघितलं असतं, तर पेपर फुटलेच नसते. ज्या दिवशी पेपर फुटला, त्या दिवशी राजीनामा दिला असता तर आम्ही म्हटलं असतं की देशाचं हित बघितले आहे. शेकडो मुले जखमी झाली, शेकडो मुली जखमी झाल्या, मुलींचे कपडे फाडले गेले. हे कायदेशीर आहे का? या रोषातून त्यांना राजीनामा द्यावा लागला; अन्यथा हे भस्मसात झाले असते असेही अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.

आम्ही श्रेय घेण्यासाठी मोर्चा काढलेला नाही. आम्ही तरुणाईला श्रेय देतो. तरुणाईची शक्ती एकवटल्यामुळे हे झाले आहे. व्यवस्थेच्या विरोधात तरुणाईने आवाज उठवला आहे यात काय राजकीय फायदा आहे? आम्ही झेंडा घेऊन गेलो असतो, आमची निशाणी घेऊन गेलो असतो, तर झाला असता असे एका प्रश्नाला उत्तर देताना दानवे म्हणाले. आम्ही खुर्चीसाठी सत्तेत नसतो असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान केले आहे. त्याबद्दल विचारले असता ते म्हणाले मग कशासाठी आहात? सत्ता आणि खुर्चीशिवाय तुमच्याकडे आहेच काय? तुम्ही गद्दारी सत्तेसाठीच केली. दिल्लीला वाऱ्या मारतात, पण काश्मीर प्रश्नावर बोलतात का? असा सवालही दानवे यांनी केला.

उद्या काहीही होऊ शकतं

या प्रश्नावर काही बोलणं योग्य नाही. ते गेले असतील, बोलावलं असेल. हा राजकीय व्यवस्थेचा भाग आहे.मात्र, कोणीही कपाळावर टिळा लावून आलेलं नाही की मी याच खुर्चीवर कायम राहणार. उद्या काहीही होऊ शकतं, हे देवेंद्रजींनाही माहिती आहे असे दावने यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली वारीवर म्हटले आहे.

भाजपामध्ये राजीनामे होत नाहीत. आम्ही आंदोलन दडपून टाकू, शेतकरी बसले होते आंदोलनाला, मग सरकारने शेतकऱ्यांचा बळी घेतला. नंतर खूप दिवसांनी त्यांनी कायदे मागे घेतले. हे मस्तीला आलेले लोक आहेत. ती मस्ती आता तरुणांनी उतरवली आहे. तरुणांनी मस्ती उतरवल्यामुळे जनतेच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला आहे की यांनाही झुकवता येतं आणि हे झुकतात असे अंबादास दानवे एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.

जेन झीने सरकारच्या झिंज्या उपटल्या असे मनसेचे प्रमुख राज ठाकरे म्हणाले आहेत. याविषयी विचारले असता अंबादास दानवे म्हणाले की त्यांचे बरोबर आहे. मुलं सरकारविषयी काय बोलली, काय गाणी रचली. आम्ही विरोधक आहोत, मानही ठेवला पाहिजे. मात्र, या पोरांनी पार बिनपाण्याने करून टाकलं सगळ्यांची. नरेंद्र मोदी साहेबांविषयी इन्स्टाग्राम व्हिडीओ खाली काय काय लिहिलं आहे, ते वाचा असा सल्लाही दानवे यांनी यावेळी सरकारला दिला आहे.

वेगळा विदर्भ होऊ शकत नाही

वेगळ्या विदर्भाची मागणी करुन काही लोक चर्चेत येण्यासाठी करत आहेत. ही मागणी कुणाचीच नाही. उगाच राजकीय अस्तित्व राहिलं नाही, म्हणून असे लोक मागणी करीत आहेत. वेगळा विदर्भ होऊ शकत नाही. हा मराठी माणसाचा अखंड महाराष्ट्र असाच कायम राहील असे अंबादास दानवे यांनी सांगितले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us