कृषीमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा घसरले; आता शेतकऱ्यांबद्दल काय म्हणाले?

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांसंदर्भात बोलताना वादग्रस्त वक्त्यव्य केलं आहे. यावरून आता वातावरण तापण्याची शक्यता आहे.

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा घसरले; आता शेतकऱ्यांबद्दल काय म्हणाले?
| Updated on: Apr 10, 2025 | 6:13 PM

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे सध्या चांगलेच चर्चेमध्ये आहेत. शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला, फळबाग आणि शेतातील इतर पिकांचं  पावसामुळे मोठं नुकसान झालं, पावसामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी पाहाणी दौऱ्यावर असातना नाशिकमध्ये माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. कर्जमाफी कधी होणार? असा प्रश्न विचारनाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी चांगलंच सुनावलं होतं.

तुम्ही दोन -चारा वर्ष कर्जमाफीची वाट पाहाता, कर्जमाफीच्या आलेल्या पैशांमधून लग्न आणि साखरपुडा करता असं माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना म्हटलं होतं. माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यावरून राज्यात चांगलंच वातावरण तापलं, विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांच्या कोंडीचा प्रयत्न झाला. मात्र त्यानंतर आपल्या या वक्तव्याबद्दल माणिकराव कोकाटे यांनी दिलगिरी व्यक्त केली होती.

परंतु आता पुन्हा एकदा माणिकराव कोकाटे यांनी कांद्याच्या दरावर बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. कांद्याचे बाजारभाव पडायला शेतकरीच जबाबदार असल्याचं म्हणत त्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सुनावलं आहे. ‘एखाद्या शेतकऱ्याला कांद्याच्या बाजारभावाचा फायदा झाला म्हणून, बाकी सगळे कांदा लावत सुटतात’  असं कोकाटे यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले कोकाटे?  

“ एखाद्या शेतकऱ्याला कांद्याच्या बाजारभावाचा फायदा झाला म्हणून, बाकी सगळे कांदा लावत सुटतात, कांद्याची लागवड किती करावी यालाही मर्यादा आहे, दुप्पट तिप्पट ठीक पण पन्नास पटीने कांद्याची लागवड करायला लागले, तर कांद्याचे बाजारभाव पडणारच, अशा शब्दात कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी कांद्याच्या बाजारभावावरुन शेतकऱ्यांना सुनावलं आहे. कांद्याचा बाजरभाव पाडण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांनाच जबाबदार धरलं आहे.  दरम्यान कोकाटे यांच्या या वक्तव्यावरून आता पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे.

अवकाळीचा शेतकऱ्यांना मोठा फटका 

राज्याच्या अनेक भागांमध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. अवकाळीचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. अनेक भागांमध्ये फळ बागा आणि इतर पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. कृषीमंत्र्यांकडून नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पाहाणी दौऱ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहाणी सुरू आहे.