Supriya Sule : अनेक शंका-कुशंका.. अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दल सुप्रिया सुळे यांची मोठी मागणी

Supriya Sule on Ajit Pawar Plane Crash : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर घातपाताचा संशय व्यक्त होत असून त्यांचे पुतणे रोहित पवार यांनी हा विषय लावून धरला आहे. तर कालच अजित दादांचे पुत्र जय पवार यांनीही ब्लॅक बॉक्सबाबत शंका उपस्थि केली होती. आता सुप्रिया सुळेही यांनाही मौन सोडत या विषयावर पहिल्यांदाच स्पष्टपणे भाष्य करत मोठी मागणी केली आहे.

Supriya Sule : अनेक शंका-कुशंका.. अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दल सुप्रिया सुळे यांची मोठी मागणी
सुप्रिया सुळे यांची मोठी मागणी
Image Credit source: social media
| Updated on: Feb 19, 2026 | 12:04 PM

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं गेल्या महिन्यात अपघाती निधन झालं. 28 जानेवारील त्यांचं विमान कोसळून अजित पवार यांच्यासह एकूण 5 जणांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनानंतर हा अपघात की घातापत अशी चर्चा सुरू झाली असून रोहित पवार यांनी गेल्या आठवड्यात 2 आणि कालही (18 फेब्रुवारी) पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्दे मांडले. काल मुंबईत त्यांनी व्हीएसआर कंपनीबद्दल अनेक दावे करत या कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचाही आरोप केला. तर अजित दादांच्या मृत्यूला 20 दिवस उलटून गेल्यानंतरही तपासाला वेग आला नसल्याबद्दल नाराजी दर्शवत त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. तसेच विमानतील ब्लॅक बॉक्स डॅमेज झाल्याचे समोर आल्यावर अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनीही काल सोशल मीडियावर पोस्ट केली.

विमान अपघातात ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाहीत; महाराष्ट्रातील जनतेला आपल्या हृदयाला हादरवून टाकणाऱ्या या दुर्घटनेचे संपूर्ण, पारदर्शक आणि निर्विवाद सत्य जाणून घेण्याचा हक्क आहे असं जय पवार यांनी लिहीलं. तसेच VSR कंपनीला उड्डाण करवण्यास बंदी घालण्याची मोठी मागणीही त्यांनी केली. त्यातच आता अजित पवार यांची बहीण आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीही या विषयावर पहिल्यांदाच स्पष्टपणे भाष्य करत मोठी मागणी केली आहे.
आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या शंकांची तातडीने चौकशी करण्याची आणि त्यांना कडेकोट सुरक्षा पुरवण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे ?

राष्ट्रवादी काँग्रे, शरद पवार गटाच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी X वर एक मोठ्ठी पोस्ट केली आहे. “आदरणीय अजितदादा यांच्या अपघाती मृत्यूनंतर संबंध महाराष्ट्राला धक्का बसलेला आहे. समाजमाध्यमांतून अनेक शंका-कुशंका व्यक्त केल्या जात आहेत. जनभावना अतिशय तीव्र असून लोक अजूनही शोकाकूल अवस्थेत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार ( @RRPSpeaks) हे अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने काही मुद्दे, तथ्ये, शंका उपस्थित करीत आहेत. त्यांची उत्तरे जनतेला मिळालीच पाहिजेत. ही उत्तरे मिळण्यासाठी यंत्रणेकडून उशीर लागत असेल तर अस्वस्थता आणखी वाढेल. ती वाढू नये यासाठी या घटनेतील सत्य लोकांसमोर पारदर्शक पद्धतीने पुढे येणे अतिशय गरजेचे आहे ” असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.

“व्यवस्थेला प्रश्न विचारणे हा प्रत्येक भारतीयाचा घटनादत्त अधिकार आहे. रोहित व्यवस्थेपुढे जनतेच्या मनातील शंका, प्रश्न उपस्थित करीत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर त्यांना सुरक्षा मिळणे अतिशय गरजेचे असून त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारने घेतली पाहिजे” अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी केली.

 

काल झालेल्या पत्रकार परिषदेतही रोहित पवार यांनीही, आपल्या कुटुंबीयांना आपल्या सुरक्षितेची काळजी वाटत असल्याचं म्हटलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांचं हे ट्विट, ही मागणी महत्वाची ठरताना दिसत आहे.