मविआकडून अजितदादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर, बड्या नेत्याचं मोठं वक्तव्य, फक्त अट एकच..

मुख्यमंत्रिपदासाठी योग जुळून यावा लागतो, मलाही वाटतं मुख्यमंत्री व्हाव, पण कुठे जमतंय, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं, त्यानंतर आता त्यांना मविआच्या नेत्याकडून मुख्यमंत्रिपदाची ऑफर देण्यात आली आहे.

मविआकडून अजितदादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर, बड्या नेत्याचं मोठं वक्तव्य, फक्त अट एकच..
| Updated on: May 04, 2025 | 6:13 PM

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेकदा मुख्यमंत्रिपदाबाबत वक्तव्य केलं आहे. त्यातून त्यांची मुख्यमंत्रिपदाची इच्छा देखील दिसून येते, दरम्यान त्यांनी पुन्हा एकदा दोन मे रोजी मुख्यमंत्रिपदासंदर्भात एक वक्तव्य केलं होतं, त्यामुळे ते चर्चेत आले. ‘मुख्यमंत्रिपदासाठी योग जुळून यावा लागतो. कारण मलाही गेल्या अनेक वर्षांपासून वाटतं की मी मुख्यमंत्री व्हावं. पण कुठे जमतंय,”  असं अजित पवार यांनी म्हटलं. दरम्यान अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी अजित पवार यांना थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे. ते रत्नागिरीमध्ये बोलत होते.

नेमकं काय म्हणाले विनायक राऊत? 

विनायक राऊत यांनी अजित पवार यांना थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे.  अजित पवार यांनी महाविकास आघाडीमध्ये यावं, त्यांचे मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पूर्ण होईल असं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये दुरी वाढत असून शिंदेंना नैराश्य आलं आहे, असा टोलाही यावेळी राऊत यांनी लगावला आहे.

गेल्या काही दिवसांपासून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. महाराष्ट्राच्या अस्तिवापुढे आमचे वाद, भांडणं या शुल्लक गोष्टी असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. तर उद्धव ठाकरे यांनी देखील राज ठाकरे यांच्या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद दिला होता, यावर देखील यावेळी विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  ठाकरे बंधू एकत्र यावेत ही महाराष्ट्रच्या जनतेची इच्छा असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.

पहलगामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले, या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. पहलगाममध्ये दहशतवादी अचानक आले नाहीत, पहलगाम हल्ला हा मोदी सरकारचं अपयश आहे,  सध्या युद्धाचं वातावरण तयार केले जात असून, पक्षाची प्रसिद्धी केली जात आहे. अनेक लोकउपयोगी योजना बंद पडल्या आहेत, असा हल्लाबोल यावेळी राऊत यांनी केला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us