
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी अंत झाला. या घटनेनंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. आता या प्रकरणाने एक धक्कादायक वळण घेतले आहे. ज्या VSR व्हेंचर्स कंपनीचे विमान अजित पवार वापरत होते, ती कंपनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आधीच ब्लॅकलिस्ट म्हणजे काळ्या यादीत असल्याची माहिती समोर येत आहे. युरोपियन युनियनच्या सुरक्षा यंत्रणेने (EASA) या कंपनीच्या सुरक्षिततेवर गंभीर ताशेरे ओढले होते. तरीही ही कंपनी सेवा कशी पुरवत होती, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
विमान वाहतुकीतील आंतरराष्ट्रीय मानकांनुसार, युरोपियन युनियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सीने (EASA) VSR व्हेंचर्स या कंपनीला लेव्हल १ ची नोटीस दिली होती. याचा अर्थ असा की, कंपनीच्या विमानांमध्ये प्रवाशांचा जीव धोक्यात येऊ शकतो अशी गंभीर तांत्रिक त्रुटी होती. सप्टेंबर २०२३ मध्ये मुंबईत झालेल्या एका अपघातानंतर कंपनीने आवश्यक कागदपत्रे आणि सुरक्षा रेकॉर्ड देण्यास नकार दिला होता. ज्यामुळे त्यांचे परवाने वर्षभरापूर्वीच निलंबित करण्यात आले होते.
आता याप्रकरणी युरोपियन युनियनच्या सुरक्षा यंत्रणेने तपासातील ३ सर्वात मोठे खुलासे केले आहेत. सुरक्षिततेच्या कारणास्तव बंदी असूनही ही कंपनी उड्डाणे कशी करत होती? हे यंत्रणेचे मोठे अपयश मानले जात आहे. मूळ पायलट वाहतूक कोंडीत अडकल्याने १५ हजार तासांचा अनुभव असलेल्या कॅप्टन सुमित कपूर यांना ऐनवेळी बोलावण्यात आले होते. त्यांना उड्डाणाची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नव्हता का? असा संशय व्यक्त होत आहे. तसेच पहिल्या प्रयत्नात लँडिंग न होणे आणि दुसऱ्या प्रयत्नात संतुलन बिघडणे, यामागे इंजिन निकामी होणे किंवा अनस्टेबल फायनल अप्रोच कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) सोपवला आहे. केंद्राच्या AAIB विभागाने ब्लॅक बॉक्स जप्त केला आहे. यातील माहितीवरून अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होईल. कंपनीच्या मालकांवर कडक कारवाई होण्याची दाट शक्यता आहे.
अजित पवार यांचे विमान २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८:१० वाजता मुंबईहून बारामतीसाठी रवाना झाले. सकाळी ८:४६ च्या सुमारास बारामती विमानतळावर लँडिंगचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाला. दुसऱ्यांदा लँडिंगचा प्रयत्न करत असताना विमानाचे संतुलन बिघडले आणि ते धावपट्टीपासून काही अंतरावर एका शेतात कोसळले. जमिनीवर आदळताच विमानाचा भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह त्यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव, वैमानिक कॅप्टन सुमित कपूर, सह-वैमानिक शांभवी पाठक आणि फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी अशा ५ जणांचा जागीच मृत्यू झाला होता.