
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला आहे, या अपघातामध्ये अजित पवार यांचं निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. अजित पवार हे मुंबईवरून बारामती दौऱ्यासाठी रवाना झाले होते, मात्र विमान धावपट्टीवर उतरण्यापूर्वीच नियंत्रण सुटलं आणि विमान कोसळल्याची माहिती समोर येत आहे. हा विमान अपघात एवढा भीषण होता की, या विमानामध्ये अजित पवार यांच्यासह आणखी चार जण प्रवास करत होते, या सर्वांचा या विमान अपघात मृत्यू झाला आहे. या विमान अपघाताचं एक सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलं आहे, ज्यामध्ये विमान खाली कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाल्याचं पहायला मिळालं. घटनास्थळी मोठा आवाज देखील झाला. दरम्यान यावर आता केंद्रीय विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
नेमकं काय म्हटलं नायडू यांनी?
माझं हृदय जड झाल आहे, ही गोष्ट पचण्यासारखी नाही, आमची अजित पवार यांच्यासोबत भेट व्हायची, ते सातत्याने मार्गदर्शन करायचे. त्यांच्या कामाचा आवाका प्रचंड होता. त्यांच्या जाण्यानं मोठं नुकसान झालं आहे. त्यांच्यासारखा नेता आता मिळणं अवघड आहे. हा अपघात नेमका कसा झाला, याचा तपास सुरू केला आहे. जेव्हा विमान उतरवण्याचा प्रयत्न सुरु होता तेव्हा, त्यामध्ये तांत्रिक बिघाड झाला अशी प्रतिक्रिया यावेळी राम मोहन नायडू यांनी दिली आहे.
मोहळ यांची प्रतिक्रिया
दरम्यान या अपघातावर प्रतिक्रिया देताना मंत्री मुरलीधर मोहळ यांचे डोळे पाणवले आहेत, अनपेक्षित धक्का आहे. अजूनही यावर विश्वास बसत नाही. अजितदादा यांची प्रशासनावर प्रचंड पकड होती. दादा आपल्यात नाहीत याचं दुःख होत आहे. आपल्या सगळ्याचं नुकसान झालं आहे. दादा आता नाहीत हे बोलण सुद्धा वेदना देणारं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात मोजके नेते सर्वपक्षीय नेत्यांच्या मानावर राज्य करतात, त्यात दादांचा समावेश होतो. दादांशिवाय पुण्याच राजकारण कल्पनाच करता येत नाही. हा सगळ्यांवरच प्रचंड मोठा अघात आहे. मला आज काय बोलावं सूचत नाही, असं मोहळ यांनी म्हटलं आहे.