
Indrayani River Student Drowned : पुण्यातील इंद्रायणी नदीपात्रात वेदश्री तपोवनचे तीन विद्यार्थी बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी (19 ऑगस्ट) सकाळच्या सुमारास ही घटना घडली. श्रावण पूजननिमित्त नदी पूजनासाठी हे विद्यार्थी नदीकाठावर गेले होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली. जय दायमा, ओंकार पाठक आणि प्रणव पोद्दार अशी या तीन मुलांची नावं आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील डुडुळगाव परिसरातील आळंदी या ठिकाणी असलेल्या इंद्रायणी नदीपात्रात एक मोठी दुर्घटना घडली आहे. वेदश्री व्यास तपोवन गुरुकुल निवासी आश्रमाचे तीन विद्यार्थी इंद्रायणी नदी पात्रात बुडाले आहेत. त्यापैकी एका विद्यार्थ्यांचा मृतदेह शोधण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. आज सकाळी मोशीतील तापकीर नगर भागातून वाहणाऱ्या इंद्रायणी नदी पात्रात ही दुर्दैवी घटना घडली आहे.
वेदश्री व्यास तपोवन गुरुकुल निवासी आश्रम शाळेचे जवळपास 50 ते 60 विद्यार्थी श्रावणी पूजनानिमित्त इंद्रायणी नदी पात्रात जल पूजनासाठी गेले होते. यावेळी एक विद्यार्थी नदीपात्रात उतरला होता. मात्र त्याला पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे तो बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी इतर दोन विद्यार्थ्यांनी नदीपात्रातील पाण्यात उडी मारली. मात्र दुर्देवाने त्या दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.
या दुर्दैवी घटनेनंतर सध्या आळंदीमध्ये शोकाकुल वातावरण पाहायला मिळत आहे. यानंतर आता पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने शोधकार्य सुरु केले आहे. आतापर्यंत अग्निशमन दलाला एका विद्यार्थ्याचा मृतदेह शोधण्यात यश आले आहे. जय दायमा (19) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. तर ओंकार पाठक आणि प्रणव पोद्दार या दोन विद्यार्थ्यांचा अजूनही नदीपात्रात शोध आहे. अग्निशमन दलाकडून युद्ध पातळीवर शोधकार्य सुरु आहे.
वैद्य श्री व्यास तपोवन गुरुकुल निवासी आश्रमाच्या हलगर्जीपणामुळे तीन विद्यार्थ्यांना आपला प्राण गमावावा लागला आहे. या विद्यार्थ्यांना धोकादायक नदीपात्राजवळ जाण्यासाठी गुरुकुल आश्रमाने कशी काय परवानगी दिली, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. या दुर्घटनेला कारणीभूत ठरणाऱ्या गुरुकुल निवासी आश्रमच्या संचालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी केली जात आहे.