सख्ख्या नात्याला काळिमा, चिकनच्या एका तुकड्यामुळे भाऊ संतापला अन् जे घडलं ते…

अमरावतीच्या भातकुलीत चिकन खाण्याच्या वादातून २१ वर्षीय मावस भावाने १२ वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर अपघाताचा बनाव रचणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

सख्ख्या नात्याला काळिमा, चिकनच्या एका तुकड्यामुळे भाऊ संतापला अन् जे घडलं ते...
Crime amravti
| Updated on: Feb 27, 2026 | 9:31 AM

एका बाजूला सख्ख्या नात्यांमधील ओलावा कमी होत असताना अमरावतीच्या भातकुलीतून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. केवळ चिकन खाण्यावरून झालेल्या वादामुळे एका चिमुकल्याची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका २१ वर्षीय मावस भावाने आपल्याच १२ वर्षीय लहान भावाचा लोखंडी रॉडने वार करून खून केला. जितेराजा गौड (१२) असे या मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे.

नेमकं काय घडलं?

जितेराजा आणि आरोपी बब्बू गौड (२१) हे मूळचे मध्य प्रदेशातील रहिवासी आहेत. रोजगाराच्या शोधात हे कुटुंब भातकुली तालुक्यात आले होते. अमरावतीतील भातकुलीतच ते वास्तव्यास होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरात चिकन बनवण्यात आले होते. जेवताना चिकनच्या खाण्यावरून जितेराजा आणि बब्बू यांच्यात किरकोळ बाचाबाची झाली. मात्र रागावर नियंत्रण न राहिल्याने बब्बूने घरातील लोखंडी वस्तू काढली. त्यानतंर त्याने त्याच्याच लहान भावाला मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत जितेराजा याला जोराचा फटका बसला. त्यामुळे बालकाचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी आरोपी आणि कुटुंबाने या घटनेला अपघाताचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. मुलाचा मृत्यू अपघाताने किंवा अन्य कारणाने झाला असल्याची खोटी तक्रार मृताच्या वडिलांनी पोलिसांत दिली. मात्र घटनास्थळाची पाहणी आणि मुलाच्या शरीरावरील जखमा पाहून पोलिसांना संशय आला. यानंतर भातकुली पोलिसांनी सखोल तपास सुरू केला. यावेळी कुटुंबातील सदस्यांच्या जबाबात तफावत आढळली. यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास आणि पोलिसी खाक्या दाखवताच बब्बू गौड याने हत्येची कबुली दिली.

पित्यावरही गुन्हा दाखल

या प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मुलाच्या वडिलांनी सत्य परिस्थिती माहित असूनही पोलिसांकडे अपघाताची खोटी तक्रार दिली. गुन्ह्याची माहिती लपवणे आणि पोलिसांची दिशाभूल करणे या आरोपाखाली पोलिसांनी मृताच्या वडिलांनाही या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. सध्या मुख्य आरोपी बब्बू गौड याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

बुलढाण्यात सख्ख्या भावाची हत्या

तर दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यातील राहुड येथे शेतात सख्ख्या भावाची लोखंडी रॉडने निर्घृण हत्या करून मृतदेह जाळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रोशन संजय इंगळे (३६) याने त्याचा धाकटा भाऊ चेतन इंगळे (३५) याला खामगावच्या रवी देवीदास राऊत याच्या मदतीने २५ फेब्रुवारी रोजी ठार केले. पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी मृतदेह लाकडांवर जाळून राख आणि अस्थी नदीत फेकून दिल्या होत्या. चेतन बेपत्ता झाल्याची तक्रार आल्यानंतर पिंपळगाव राजा पोलिसांनी तपास चक्रे फिरवत दोन्ही आरोपींना अटक केली. ते आता हत्येमागील कारणांचा शोध घेत आहेत. या भयानक घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us