Amravati Rain : अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टीचा तडाखा, नागरिकांच्या घरात शिरले पाणी, ॲड. यशोमती ठाकूर यांच्याकडून पाहणी

| Updated on: Jul 05, 2022 | 6:36 PM

आम्ही कायम शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांच्या पाठीशी असतो. या वेळीसुद्धा त्यांना सर्वकष मदत मिळावी, यासाठी शासन पातळीवर पाठपुरावा करणार असल्याचे ॲड. ठाकूर यांनी सांगितलं.

Amravati Rain : अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टीचा तडाखा, नागरिकांच्या घरात शिरले पाणी, ॲड. यशोमती ठाकूर यांच्याकडून पाहणी
ॲड. यशोमती ठाकूर यांच्याकडून पाहणी
Follow us on

अमरावती : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे घरांची पडझड झाली. नुकसान झालेल्या शेतीची पाहणी तिवसा (Tivasa) विधानसभा मतदार संघाच्या आमदार तथा माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केली. यावेळी जनतेला सुरक्षित आणि सजग रहाण्याचे आवाहन केले. तसेच नुकसानी संदर्भात पाहणी करून तत्काळ पंचनामे (Panchnama) करण्याच्या सूचना प्रशासनाला (Administration) दिल्या. नुकसान भरपाईसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती ॲड. ठाकूर यांनी दिली आहे. अमरावती जिल्ह्यातील विविध गावात पूरस्थिती आहे. काल 4 जुलै रोजी रात्रीच्या सुमारास झालेल्या अतिवृष्टी झाली. तिवसा तालुक्यातील अनेक गावांना फटका बसला. रात्रीच्या सुमारास जोरदार पावसामुळे पाणी नागरिकांच्या घरात शिरले.

पूरपरिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या प्रशासनाला सूचना

अन्नधान्य व इतर साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर ॲड. यशोमती ठाकूर यांनी तातडीने तालुक्यातील तिवसा, मोझरी, वरखेड, तारखेड व सातरगाव आदी गावांच्या भेटी घेतल्या. नुकसानीची पाहणी केली. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे. तसेच पावसाच्या पाण्यामुळे शेती वाहून गेल्याने शेतीचे अतोनात नुकसान झाले. काही ठिकाणी घरांची पडझड झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. अशावेळी ॲड. यशोमती ठाकूर यांनी आपला नियोजित जनता दरबार रद्द केला. थेट पूरग्रस्त भागात पाहणी दौरा सुरू केला. नागरिकांना धीर देतानाच येथील पूरस्थितीची ॲड. ठाकूर यांनी पाहणी केली. स्थानिक जनतेशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच प्रशासनाला पूरपरिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना केलेल्या आहेत.

मोर्शी, तिवसा तालुक्यात मोठं नुकसान

या अतिवृष्टीच्या संकटामुळे नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. त्यानंतर त्या म्हणाल्या, मोर्शी, तिवसा व अमरावती तालुक्यातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच शेतीला सुद्धा याचा फटका बसला आहे. त्यामुळे हे संकट सर्वांसाठीच मोठे संकट ठरले आहे. या नुकसानग्रस्त नागरिक व शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळावी, यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करणार आहे. आम्ही कायम शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांच्या पाठीशी असतो. या वेळीसुद्धा त्यांना सर्वकष मदत मिळावी, यासाठी शासन पातळीवर पाठपुरावा करणार असल्याचे ॲड. ठाकूर यांनी सांगितलं. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा