काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांना मोठा धक्का, अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी बच्चू कडू यांची निवड

| Updated on: Jul 24, 2023 | 3:11 PM

अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांना मोठा धक्का बसला आहे. कारण अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आमदार बच्चू कडू यांनी बाजी मारली आहे.

काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांना मोठा धक्का, अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी बच्चू कडू यांची निवड
Follow us on

अमरावती | 24 जुलै 2023 : अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांना मोठा धक्का बसला आहे. कारण अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आमदार बच्चू कडू यांनी बाजी मारली आहे. त्यामुळे बच्चू कडू यांची आता अध्यक्षपदी निवड झालीय. काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातोय. विशेष म्हणजे अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी यशोमती ठाकूर यांनी आपल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या मदतीने चांगलीच फिल्डिंग लावली होती. पण त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत.

अमरामती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुधाकर भारसाकळे आणि उपाध्यक्ष सुरेश साबळे यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे अध्यक्ष पदासाठी आमदार बच्चू कडू तर उपाध्यक्ष पदासाठी अभिजीत ढेपे यांनी अर्ज भरला होता. अध्यक्ष-उपाध्यक्षाच्या निवडणुकीसाठी आमदार बच्चू कडू यांच्यासह काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी जोरदार फील्डिंग लावल्याची माहिती मिळत होती. अखेर या निवडणुकीत बच्चू कडू यांची अध्यक्षपदी निवड झालीय.

‘हा दडपशाहीच्या विरोधातला विजय’

बच्चू कडू यांनी विजयानंतर प्रतिक्रिया दिलीय. “हा दडपशाहीच्या विरोधातला विजय आहे. शेतकऱ्यांना या बँकेतून कर्ज मिळावं यासाठी उपोषण करावं लागलं. त्याचा हा बदला निघाला आहे. आपल्या कार्यकर्त्याला वाईट वागणूक दिल्याने त्याचे परिणाम काय भेटतात याचा रिझल्ट आहे. आम्ही कडू जरी असलो तरी गोड बोलतो हे या निवडणुकीतून दिसून आलेलं आहे”, अशी पहिली प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर दिली.

हे सुद्धा वाचा

“आमच्यासोबत रवींद्र गायगुले आहेत. खरंतर त्यांनी पुढाकार घेतला. अभिजीत ढेपे, पाटील साहेब, आनंद काळे, पटेल आम्ही सहा-सात जण मजबूत होतो. शेतकऱ्यांप्रती चांगल्या भावना होत्या. त्यामुळे पुण्यकर्म हे कामी आलेले आहेत”, असं बच्चू कडू यांनी सांगितलं.

“शेतकऱ्याला एक नवी आस्था आणि नवी दिशा दिली जाणार. ही बँक म्हणजे अर्थकारण आहे. शेतकऱ्याचं अर्थकारण कसं मजबूत होईल, त्याची कर्जासाठी वणवण न होता त्याच्या दाराशी कसं जाता येईल, याबाबत आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करु”, असं बच्चू कडू यांनी सांगितलं.

“आधी बँकेत ज्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता होती त्यांची कामगिरी इतकी वाईट होती, त्याचं फळ हे त्यांना भेटलेलं आहे. साध्या संचालकासोबत वागताना अरेरावी केली जाते, दडपशाही आहे, हा त्याचा परिणाम आहे”, अशी टीका बच्चू कडू यांनी केली.

“ज्याच्या पाठीशी जनतेचा हात असतो त्याला नेत्याची गरज पडत नाही. जनता आमच्या पाठिशी अप्रत्यक्षरित्या भेटली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्येही आम्हाला जनता पाठिंबा देईल”, असं बच्चू कडू म्हणाले.