Breaking | अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणात मोठा ट्विस्ट, अनिल जयसिंघानीची हायकोर्टात धाव, म्हणाला, माझी अटक बेकायदेशीर!

| Updated on: Mar 23, 2023 | 4:29 PM

अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल प्रकरणाला आज वेगळं वळण मिळालंय. मुख्य संशयित आरोपी अनिल जयसिंघानी याने आपली अटकच बेकायदेशीर असल्याचा दावा केलाय.

Breaking | अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणात मोठा ट्विस्ट, अनिल जयसिंघानीची हायकोर्टात धाव, म्हणाला, माझी अटक बेकायदेशीर!
Image Credit source: PTI
Follow us on

मुंबई : अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांना 1 कोटी रुपयांची लाच (Bribe) देऊन ब्लॅकमेलिंग प्रकरणात मोठा ट्विस्ट आलाय. या प्रकरणातील मुख्य आरोपी, संशयित अनिल जयसिंघानीला (Anil Jaisinghani) मोठा सापळा रचून पोलिसांनी गुजरातहून अटक केली. त्याच्यासोबत अन्य दोघांनाही चौकशीकरीता ताब्यात घेण्यात आलंय. मात्र आज या प्रकरणाला नवं वळण मिळालय.  पीटीआयच्या वृत्तानुसार, बुकी अनिल जयसिंघानीने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. आपल्या विरोधातील एफआयआर रद्द करण्याची मागणी जयसिंघानीने केली आहे. तसेच या प्रकरणात त्याला झालेली अटकच बेकायदेशीर असल्याचा दावा त्याने याचिकेत केला आहे.

अनिल जयसिंघानीची याचिका काय?

अमृता फडणवीस यांनी 16 मार्च रोजी त्यांना 1 कोटी रुपयाची लाच देण्यासाठी ब्लॅकमेल करण्यात आल्याची तक्रार मलबार हिल पोलिस स्टेशनमध्ये दिली होती. यावरून त्यांना धमकीही देण्यात आल्याचं तक्रारीत म्हटलंय. अनिल जयसिंघानी, त्याची मुलगी अनिक्षा यांच्या विरोधात ही तक्रार होती.

या प्रकरणातील आरोपी अनिल जयसिंघानी तसेच त्याचे नातेवाईक निर्मल जयसिंघानी यांना 20 मार्च रोजी गुजरात येथून अटक करण्यात आली होती. मात्र हा आरोप पूर्णपणे चुकीचा असून या प्रकरणात आरोपींना विनाकारण गोवण्यात आलंय, अशी याचिका दाखल करण्यात आली आहे. अनिल जयसिंघानी यांचे वकील मनन संघई यांनी मुंबई उच्च न्यायालयात गुरुवारी ही याचिका दाखल केली. अनिल जयसिंघानी याला झालेली अटक बेकायदेशीर असल्याचं याचिकेत म्हटलंय.

कायद्यानुसार घेतला आक्षेप?

अनिल जयसिंघानीकडून दाखल केलेल्या याचिकेत आणखी एक दावा करण्यात आलाय. कायद्यातील तरतुदींनुसार, अटक केल्यापासून 24तासांच्या आत कोर्टासमोर हजर न करणे तसेच आरोपीला कोर्टासमोर हजर करण्यात विलंब करणे तसेच पोलिसांनी सीआरपीसीतील तरतुदींचं पालन न करणे यावरून आरोपींबाबत पूर्वग्रह असल्याचे दर्शवते. अनिल जयसिंघानी याला अटकेच्या 36  तासानंतर कोर्टासमोर हजर करण्यात आलं. यामुळे सीआरपीसी तरतुदींचे तसेच मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाल्याचा आरोप याचिकेत करण्यात आलाय. त्यामुळे अनिल जयसिंघानीविरोधातील एफआयआर रद्द करून सत्र न्यायालयाने दिलेला रिमांडचा आदेश तसेच अटक बेकायदेशीर असल्याचे घोषित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

याचिकेवर सोमवारी सुनावणी

अनिल जयसिंघानी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार आहे. 20 मार्च रोजी अनिल जयसिंघानी आणि निर्मल जयसिंघानी यांना गुजरातमधून ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर त्यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी डी आलमाले यांच्यासमोर हजर करण्यात आलं. कोर्टाने या दोघांना 27 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी दाखल अनिक्षा आणि अनिल जयसिंघानी या बाप-लेकीविरोधात तक्रार दाखल केली होती. गुन्हेगारी कट, खंडणी तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल जयसिंघानी याच्याविरोधात किमान  17  खटले प्रलंबित असल्याची माहिती यापूर्वी पोलिसांनी दिली आहे.