AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?

Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?

| Updated on: Jul 02, 2026 | 7:41 PM
Share

रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे आंबेनळी घाटात पुन्हा एकदा दरड कोसळल्याची घटना घडली आहे. बावळी टोक परिसरात मोठे दगड रस्त्यावर कोसळल्याने वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक काम असल्यासच घाटमार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे आंबेनळी घाटात पुन्हा एकदा दरड कोसळल्याची घटना घडली आहे. बावळी टोक परिसरात मोठे दगड रस्त्यावर कोसळल्याने वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक काम असल्यासच घाटमार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

माहितीनुसार, आंबेनळी घाटातील रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या कामादरम्यान अनेक ठिकाणी डोंगर कापण्यात आल्याने दगड आणि दरडी कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मंगळवारी रात्री पायटा ते कुंभळवणे दरम्यान दगड कोसळल्यानंतर गुरुवारी सकाळी बावळी टोक येथे पुन्हा दरड कोसळल्याची घटना घडली.

या पार्श्वभूमीवर पोलादपूरचे तहसीलदार कपिल घोरपडे यांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत, आवश्यक असेल तरच आंबेनळी घाटातून प्रवास करावा, असे आवाहन केले आहे. दरडी कोसळण्याच्या घटना अशाच सुरू राहिल्यास गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही आंबेनळी घाट वाहतुकीसाठी बंद करण्याची अधिसूचना जारी होण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे, जुलै २०२१ मधील अतिवृष्टीदरम्यान आंबेनळी घाटात अनेक ठिकाणी मोठ्या दरडी कोसळून वाहतुकीचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर घाटरस्ता कायमस्वरूपी सुरक्षित आणि मजबूत करण्यासाठी हा मार्ग महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (MSIDC) कडे सोपविण्यात आला असून, सातारा बाजूकडून रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम सुरू आहे.

दरम्यान, सतत सुरू असलेल्या पावसामुळे घाट परिसरातील परिस्थितीवर प्रशासनाकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून, वाहनचालकांनी सावधगिरी बाळगून प्रवास करावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Published on: Jul 02, 2026 07:41 PM

Follow Us