
भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार या दोन्ही नेत्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमाला त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस या देखील उपस्थित होत्या. त्यांनी शपथविधीनंतर ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. “देवेंद्र स्वत: म्हणाले होते की, पुन्हा येईन. पण ते स्वत:साठी नाही तर जनतेसाठी आले. हा जनतेचा सन्मान आहे. महायुतीने जो निर्णय घेतला तो आज तुमच्यासमोर आहे. आमचे नेता सक्षम आहेत. त्यांना लोकांच्या भावना माहिती आहे. ते लवकरच लोकार्पित निर्णय घेणार”, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली.
“मला खूप आनंद होतोय की, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आपल्या उपमुख्यमंत्र्यांनीदेखील शपथ घेतली. आज लोकांचा जो कौल होता त्याचा आदर झाला आहे याचा आनंद आहे. लोकांचा कौल हा आजच्या दिवसासाठी होता. आज त्यांना लोकांसाठी काम करण्याची आणि प्रगतीची वेग वाढवण्यासाठी अजून जास्त शक्ती दिलेली आहे. फडणवीस यांच्यापुढे अनेक आव्हानं आहेत, पण ते यशस्वीरित्या ते पेलतील याची खात्री आहे”, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘एक्स’वर ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत. “आज माझे स्नेही आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील नेते श्री. देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, याबद्दल त्यांचं अभिनंदन. २०१९ ला खरंतर ही संधी त्यांना मिळायला हवी होती, पण तेंव्हा आणि पुढे २०२२ मध्ये जे घडलं त्यामुळे ती संधी हुकली. असो, पण यावेळेस महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला जे प्रचंड अविश्वसनीय बहुमत दिलं आहे, त्याचा या राज्यासाठी, इथल्या मराठी माणसांसाठी आणि मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी तुम्ही योग्य वापर कराल अशी मी आशा करतो”, असं राज ठाकरे म्हणाले.
“पुढची ५ वर्ष सरकारच्या कुठल्याही चांगल्या उपक्रमांना माझा, माझ्या पक्षाचा पाठींबा असेल. पण सरकार चुकतंय, लोकांना गृहीत धरतंय असं जर जाणवलं, तर मात्र विधिमंडळात जरी सध्या शक्य नसलं तरी, विधिमंडळाच्या बाहेर मात्र आम्ही सरकारला त्यांच्या चुकांची जाणीव करून देऊ हे नक्की. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि तसंच भविष्यातील त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शुभेच्छा”, असंही राज ठाकरे म्हणाले.