देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातच पाहिजे… अमृता फडणवीस पुन्हा बोलल्या
Amruta Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रात जाणार आणि महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळणार असं बोललं जात आहे. यावर आता अमृता फडणवीस यांनी भाष्य केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशाच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रात जाणार आणि महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळणार असं बोललं जात आहे. खासकरून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीस हे शिक्षण खात्याची जबाबदारी स्वीकारणार असल्याचंही बोललं जात आहे. मात्र भाजपकडून यावर अद्याप अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही. अशातच आता देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार नाहीत अशी माहिती दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
देवेंद्रजी महाराष्ट्रातच हवेत
पुण्यात अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार का याबाबत प्रश्न विचारला होता. यावर बोलताना अमृता फडणवीस यांनी म्हटले की, देवेंद्र फडणवीस यांचे चुलते यांनी देवेंद्र भविष्यात देशाचे पंतप्रधान होतील असे वक्तव्य केले होते. या संदर्भात त्यांचे अनेक हितचिंतक आहेत पण मी महाराष्ट्राची मुलगी असल्यामुळे देवेंद्र महाराष्ट्रातच हवेत.’ त्यामुळे अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार नसल्याचे विधान केले आहे.
सुनेत्रा पवारांवरील विधानावरही भाष्य
काँग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा उल्लेख गुंगी गुडिया असा केला आहे. याबाबत अमृता फडणवीस यांचा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना त्यांनी म्हटले की, ‘काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्या बद्दल गुंगी गुडिया अशी टीका केली त्याबद्दल त्यांना माफी मागावी.’ आता काँग्रेस माफी मागणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
देवेंद्र फडणवीस यांचेही सुनेत्रा पवार यांच्या विधानावर भाष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी त्यांना काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्यावर केलेल्या टीकेबाबत प्रश्न विचारला होता. यावर बोलताना फडणवीस यांनी म्हटले की, मला असं वाटतं की अतिशय खालच्या स्तरावर हे उतरलेले आहेत. मुळामध्ये यांना कुठलाही रिस्पॉन्स मिळत नाही. त्यांना कुणी विचारत नाही. त्यामुळे बातमीत येण्यासाठी अशा पद्धतीचं विधान केलं जात आहे. बदनाम हुये तो हुये, नाम तो हुआ अशा पद्धतीने यांची कार्यवाही सुरू आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत इतक्या खालच्या स्तराला जाणारे हे आता आपल्याला पहिल्यांदाच पहायला मिळत आहेत.