अजित पवार आणि सुनील तटकरेंबद्दल अंजली दमानियांचे मोठे विधान; म्हणाल्या त्यांचं कधीच…
'ऑपरेशन टायगर' आणि भोंदू खरात प्रकरणामुळे राजकारणाची प्रतिमा मलिन झाल्याची टीका अंजली दमानिया यांनी केली आहे. सुनील तटकरे, अजित पवार आणि रूपाली चाकणकर यांच्याबाबत त्यांनी खळबळजनक दावे केले आहेत.

राज्यात सध्या वेगवान राजकीय घडामोडी सुरु आहेत. याच राजकीय घडामोडी आणि ऑपरेशन टायगर या प्रकरणावर प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तीव्र शब्दांत टीका केली आहे. अशा प्रकारच्या गुप्त मोहिमांमुळे आणि अंतर्गत कुरघोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची प्रतिमा अत्यंत मलिन झाली आहे. यामुळे सामान्य लोकांचा राजकारणावरील विश्वास उडाला आहे, अशी खंत अंजली दमानिया यांनी व्यक्त केली. नुकतंच प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी अनेक खळबळजनक दावे केले.
तटकरे-कोकाटे आणि फडणवीस भेट धक्कादायक
सुनील तटकरे यांनी जर माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली असेल आणि या पार्श्वभूमीवर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असेल, तर हे अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकरण आहे. माझ्या माहितीनुसार अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यात फारसे पटत नव्हते, त्यांचे संबंध फारसे चांगले नव्हते, असा दावाही अंजली दमानिया यांनी केला आहे. त्यामुळे या नेत्यांमधील अंतर्गत समीकरणे आता कोणत्या दिशेला जातात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
भोंदू खरात आणि चाकणकरांच्या संबंधांची चौकशी व्हावी
या प्रकरणातील संशयित भोंदू अशोक खरात याचे रूपाली चाकणकर यांच्याशी संबंध असल्याचा आरोप करत अंजली दमानिया यांनी गंभीर सवाल उपस्थित केले आहेत. राजकारण नेमकं हेच लोक चालवणार का? आणि कोणत्या मंत्र्याला कोणते पद द्यायचे हे असले लोक ठरवणार का? असा संतप्त सवाल अंजली दमानिया यांनी केला. तसेच या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास व्हायला हवा, अशी मागणी त्यांनी केली.
एकाच फोनमध्ये ५ सिम कार्ड; तपासात धक्कादायक माहिती
या प्रकरणाच्या तपासातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर येत असल्याचा उल्लेख अंजली दमानिया यांनी केला. संशयित आरोपी खरात याने एकाच सेल्फोनमध्ये तब्बल पाच वेगवेगळ्या सिम कार्डचा वापर केल्याचे उघड झाले आहे. यावरून हे रॅकेट किती वेगवेगळ्या आणि नियोजनबद्ध पद्धतीने चालवले जात होते, हे स्पष्ट होत आहे, असे अंजली दमानियांनी म्हटले.
शरद पवार हे अत्यंत ज्येष्ठ नेते आहेत, परंतु ते कोणत्या अर्थाने आणि कधी काय बोलतील, याचा काहीच नेम सांगता येत नाही. मात्र एकूणच या सर्व प्रकारामुळे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीची पातळी घसरत चालली आहे, असे अंजली दमानिया म्हणाल्या.