Ajit Pawar : खूप दु:खद घटना, अजितदादांच्या अपघाती मृत्यूनंतर अण्णा हजारेंनी व्यक्त केला शोक!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे. त्यांच्या अकाली जाण्याने राज्यभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 29 जानेवारी रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे.

Ajit Pawar : खूप दु:खद घटना, अजितदादांच्या अपघाती मृत्यूनंतर अण्णा हजारेंनी व्यक्त केला शोक!
ajit pawar and anna hazare
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 28, 2026 | 3:28 PM

Ajit Pawar Plane Crash : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. पुणे जिल्ह्यातील बारामती येथे ते विमानातून प्रवास करत होते. यावेळी तांत्रिक बिघाड झाल्याने सकाळी 8 वाजून 45 मिनिटांनी विमान थेट जमिनीवर कोसळले आणि यातच अजित पवार यांचा मृत्यू झाला. यावेळी अजितदादांसोबत असणारे त्यांचे सुरक्षा रक्षक, क्रू मेंबर आणि पायलट यांचाही मृत्यू झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, विमान जमिनीवर आदळल्यानंतर क्षणात मोठा स्फोट झाला. दरम्यान, अजितदादांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्रासह देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीदेखील दु:ख व्यक्त केले असून अजित पवार यांच्या आत्म्याला शांती मिळो, अशी प्रार्थनादेखील त्यांनी केली आहे.

अण्णा हजारे नेमकं काय म्हणाले?

‘राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाले आहे. त्यांचा पक्ष किंवा राजकारणानिमित्त आमची कधीही भेट झाली नाही. परंतु एक व्यक्ती समाज आणि देशासाठी किती काम करू शकते, हे त्यांच्याकडे पाहून समजून यायचे. मी एवढेच म्हणेन की ही फार दुख:द घटना घडलेली आहे. परंतु त्यांच्या आत्म्याला चीरशांती मिळावी हीच देवाकडे प्रार्थना करतो,’ अशा भावना अण्णा हजारे यांनी व्यक्त केल्या.

राज्यात तीन दिवसांचा दुखवटा

अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी पक्षाचे अनेक नेते भावुक झाले आहेत. अजित पवार यांच्या पक्षाचे सर्व नेते आता बारामतीला जमा झाले आहेत. अजित पवार यांच्या पत्नी सूनेत्रा पवार तसेच चुलत बहीण सुप्रिया सुळे यादेखील दिल्लीहून बारामतीत पोहोचले आहेत. खासदार शरद पवार तसेच इतर सर्व पवार कुटुंबीय बारामतीत पोहोचले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार 29 जानेवारी रोजी बारामती येथे शरद पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली जाण्यामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. तसेच 28 जानेवारी रोजी सर्व शासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.