आशिष शेलार नवी मुंबई दौऱ्यावर, मंदा म्हात्रेंशी भेट, नाईकांसोबत मतभेद मिटवण्याचे प्रयत्न?

| Updated on: Jan 13, 2021 | 2:34 PM

आशिष शेलार यांनी भाजप आमदार मंदा म्हात्रे यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली. (Ashish Shelar meets Manda Mhatre)

आशिष शेलार नवी मुंबई दौऱ्यावर, मंदा म्हात्रेंशी भेट, नाईकांसोबत मतभेद मिटवण्याचे प्रयत्न?
Follow us on

नवी मुंबई : आगामी ग्रामपंचायत आणि महापालिका निवडणुकांच्या तोंडावर पक्षातील गळती रोखण्यासाठी भाजप नेते सरसावले आहेत. एकीकडे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नाशिकच्या मैदानात उतरले आहेत, तर दुसरीकडे भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मिशन नवी मुंबई हाती घेतले आहे. नवी मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी (Navi Mumbai Municipal Election) भाजपमधील मतभेद दूर करण्यासाठी आशिष शेलार नवी मुंबई दौऱ्यावर आहेत. (Ashish Shelar at Navi Mumbai discuss with Manda Mhatre Ganesh Naik)

आशिष शेलार यांनी भाजप आमदार मंदा म्हात्रे यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली. शेलार आणि म्हात्रे या दोघांमध्ये आगामी निवडणुकांसंदर्भात जवळपास एक तास चर्चा केल्याची माहिती आहे. निवडणूक प्रभारी येणार म्हणून मंदा म्हात्रेंच्या बंगल्यावर कार्यकर्त्यांनी गर्दी केली. शेलारांनी स्थानिक नेते आणि नगरसेवकांशीही चर्चा केली. विधानसभा निवडणुकांपूर्वी राष्ट्रवादीतून आलेले दिग्गज नेते गणेश नाईक यांच्यासोबत मंदा म्हात्रेंचे शीतयुद्ध सर्वश्रुत आहे. मात्र निवडणुकीच्या तोंडावर अंतर्गत मतभेद मिटवण्यासाठी भाजपची जोरदार फील्डिंग सुरु असल्याचं दिसत आहे.

गणेश नाईकांचं नवी मुंबईवर वर्चस्व

गणेश नाईक राष्ट्रवादीत असल्यापासून नवी मुंबई आणि ठाणे या भागातील दिग्गज नेते आहेत. 17 डिसेंबर 1992 रोजी नवी मुंबई महानगरपालिका स्थापन झाली. तेव्हापासून नवी मुंबई महापालिकेवर गणेश नाईक यांची एकहाती सत्ता होती. गणेश नाईक आधी शिवसेनेत होते. 1990 ला ते पहिल्यांदा नवी मुंबईतून आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 25 मे 1999 रोजी शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करण्यात आली. तेव्हा गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर राज्यातील सत्तेची समीकरणं कितीही बदलली तरी नवी मुंबईत मात्र राष्ट्रवादीचीच सत्ता राहिली.

2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मोदी लाटेमुळे गणेश नाईक यांना पराभव स्वीकारावा लागला. ते भाजप नेत्या मंदा म्हात्रे यांच्याकडून पराभूत झाले. भाजपच्या तिकीटावर 2019 मध्ये ते ऐरोली मतदारसंघातून रिंगणात उतरले आणि विजयी झाले. मात्र एका पक्षात असूनही म्हात्रे आणि नाईक यांच्यात विस्तव जात नसल्याचे बोलले जाते.

संबंधित बातम्या : 

भाजपमधील आऊटगोईंग रोखण्यासाठी देवेंद्र फडणवीस उतरणार मैदानात

जळगावात भाजपला मजबूत करायचंय, मतभेद विसरा, गिरीश महाजनांच्या सूचना

(Ashish Shelar at Navi Mumbai discuss with Manda Mhatre Ganesh Naik)