रुपाली चाकणकरांसह राजकीय व्यक्तींची चौकशी होणार का? SIT ने नेमकं काय सांगितलं?
Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणाची चौकशी SIT कडून केली जात आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत SIT च्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांना राजकीय नेत्यांची चौकशी होणार का याबाबत विचारण्यात आले, यावर त्यांनी काय म्हटले ते जाणून घेऊयात.

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाची चौकशी IPS अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखालील SIT पथकाकडून केली जात आहे. या तपासात रोज नवनवे खुलासे होताना पहायला मिळत आहे. अशातच आज तेजस्वी सातपुते यांनी या प्रकरणाबाबत एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि खरातशी संबंध असणाऱ्या राजकीय नेत्यांची चौकशी होणार का असा प्रश्न विचारण्यात आला होता. याबाबत त्यांनी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. तेजस्वी सातपुते नेमकं काय म्हणाल्या ते सविस्तर जाणून घेऊयात.
रुपाली चाकणकर आणि राजकीय नेत्यांची चौकशी होणार का?
पत्रकार परिषदेदरम्यान तेजस्वी सातपुते यांना रुपाली चाकणकर आणि इतर राजकीय नेत्यांची चौकशी होणार का असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना तेजस्वी सातपुते यांनी म्हटले की, या प्रश्नाचे उत्तर मी आधीच दिले आहे. या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला सातपुते यांनी म्हटले होते की, या प्रकरणातील पदाधिकारी वगैरेंना चौकशीसाठी बोलवणार का? किंवा का बोलावलं नाही असं तुम्हाला वाटत असेल. मला पत्रकारांचे मेसेज आले आहे. फिर्यादी आणि साक्षीदार सांगतात त्या अनुषंगाने तपास होतात. पुराव्यावरून कोण व्यक्ती सहआरोपी आहेत का हे पाहिलं जातं. या गुन्ह्यातही मुख्य आरोपी सोडून कोणी सहाय्यभूत ठरलं आहे का? कुणी या गुन्ह्यासाठी मदत केली आहे का? याबाबतचे पुरावे मिळाले तर कारवाई केली जाईल. 17 दिवसांपासून एसआयटी तपास करत आहे. अजून तपास सुरू आहे.’
अशोक खरात प्रकरणातील एसआयटीच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी या पत्रकार परिषदेत कोणत्याही राजकीय व्यक्तीचे नाव घेतलेले नाही. मात्र त्यांनी या प्रकरणात संबंध आढळल्यास संबंधित व्यक्तीवर कारवाईचे संकेत दिले आहेत. त्यामुळे जर आता आगामी काळात एखाद्या राजकीय व्यक्तीचे नाव या प्रकरणात समोर आले तर त्याची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता आगामी काळात या चौकशीला काय वळण मिळते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
खरातकडून बदनामीची धमकी देऊन लैंगिक शोषण
तेजस्वी सातपुते यांनी पुढे बोलताना सांगितले की, ‘चौकशीतून आरोपी खरात पीडीत व्यक्तीच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत होता. धमकी देत होता. भीती दाखवत होता. खडे, चिंचोके इत्यादी गोष्टीद्वारे पैसा उकळत होता. महिलांना दैवी शक्ती असल्याचं सांगत होता. कुटुंबीयांच्या मृत्यूची भीती दाखवून, त्यांना बदनामीची धमकी देऊन लैंगिक शोषण करत होता. ईशान्यश्वर मंदिराच्या परिसरात अंधारात दैवी शक्ती असल्याचं भासवून अंधश्रद्धा पसरवत होता असं समोर आलं आहे.’