स्वत:च्या लग्नात हळदीलाही…; भोंदू बाबा अशोक खरातचा अजब किस्सा समोर

नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणाने नवे वळण घेतले असून, त्याची पत्नी कल्पना खरात हिच्या माहेरच्या पाडळी ग्रामस्थांनी खळबळजनक खुलासे केले आहेत. लग्नात कपडे न काढण्यापासून ते १६ वर्षे माहेराशी संपर्क तोडण्यापर्यंतची धक्कादायक माहिती वाचा या सविस्तर बातमीत.

स्वत:च्या लग्नात हळदीलाही...; भोंदू बाबा अशोक खरातचा अजब किस्सा समोर
Ashok kharat
| Updated on: Apr 03, 2026 | 1:47 PM

नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण दिवसेंदिवस अधिक गुंतागुंतीचे होताना पाहायला मिळत आहे. अशोक खरात प्रकरणी तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर येताना दिसत आहेत. अशोक खरातची पत्नी कल्पना खरात हिचे माहेर असलेल्या सिन्नर तालुक्यातील पाडळी गावात आता खळबळजनक चर्चा सुरु झाली आहे. एसआयटीने पाडळी येथे जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने चौकशी केली. या चौकशीत अशोक आणि कल्पना खरात यांच्याबद्दल अनेक जुन्या आठवणी आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे.

लग्नावेळीचा एक अजब किस्सा

अशोक खरातची पत्नी कल्पना खरात ही बेपत्ता झाली आहे. सध्या पोलीस तिचा शोध घेत आहे. आता अशोक खरातची पत्नी कल्पना खरातबद्दल विशेष तपास पथकाच्या (SIT) हाती महत्त्वाची माहिती लागली आहे. पाडळी येथील ग्रामस्थांनी अशोक खरात आणि कल्पना यांच्या लग्नावेळीचा एक अजब किस्सा सांगितला आहे. कल्पना आणि अशोक खरात यांचे लग्न अगदी साध्या पद्धतीने पार पडले होते. मात्र, लग्नापूर्वीच्या हळदीच्या विधीवेळी अशोक खरातने आपले कपडे काढण्यास नकार दिला होता. त्याचे हे वागणे तेव्हाही ग्रामस्थांना अनाकलनीय वाटले होते. तो गावात कधीतरीच यायचा, मात्र त्याचे वागणे नेहमीच संशयास्पद असायचे, असा खुलासा ग्रामस्थांनी केला आहे.

कल्पनाच्या वडिलांच्या अंत्यविधी आला

अशोक खरात हा नेहमी लोकांच्या समस्या सोडवण्याचे दावे करायचा, हे पाडळीकरांना ठाऊक होते. मात्र, तो समस्या सोडवण्यासाठी पैसे घेतो म्हणून आम्ही कधी त्याच्याकडे गेलो नाही, असे स्पष्ट मत ग्रामस्थांनी व्यक्त केले. २०११ मध्ये जेव्हा कल्पनाच्या वडिलांचे निधन झाले, तेव्हा अशोक खरात अंत्यविधी आणि दशक्रिया विधीला आला होता. त्यावेळी तो तिथे जेवलाही होता, पण तेव्हा कोणालाही त्याच्या या भोंदूगिरीचा अंदाज आला नव्हता, असेही ग्रामस्थांनी म्हटले.

माहेरची परिस्थिती हलाखीची

अशोक खरातने केवळ मोठ्या लोकांनाच नाही, तर अनेक गरिबांनाही आपल्या जाळ्यात ओढून फसवले आहे. त्याने सामान्यांना लुबाडून जी अफाट संपत्ती आणि माया जमवली आहे, ती शासनाने जप्त करून शासनजमा करावी, अशी आक्रमक मागणी आता पाडळी ग्रामस्थांनी केली आहे. या तपासात समोर आलेली सर्वात धक्कादायक बाब म्हणजे फरार असलेली कल्पना खरात गेल्या १६ वर्षांपासून आपल्या माहेरी गेलेली नाही. वडील आणि भावाच्या निधनासारख्या दु:खद प्रसंगीही ती तिच्या माहेरी गेली नव्हती.

तिच्या माहेरच्या शिंदे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आजही अत्यंत हलाखीची आहे. ते शेतीवर आपला उदरनिर्वाह करतात. पण कल्पनाने आपल्या गरीब कुटुंबाशी सर्व संबंध तोडून टाकले होते. सध्या पोलीस फरार कल्पना खरातचा शोध घेत असून, या प्रकरणात अजून किती लोकांचे नुकसान झाले आहे, याचा तपास सुरू आहे.

Follow Us