आदिवासी आंदोलक अण् अशोक उईकेंमध्ये खडाजंगी, नाशिकमध्ये वातावरण तापलं, जोरदार घोषणाबाजी

आश्रमशाळा आणि वसतिगृहांमधील असुविधांविरोधात गेल्या दोन आठवड्यांपासून नाशिकमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोल सुरू आहे. या आंदोलनाला अशोक उईके यांनी भेट दिली, मात्र या भेटीवेळी आंदोलक चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले.

आदिवासी आंदोलक अण् अशोक उईकेंमध्ये खडाजंगी, नाशिकमध्ये वातावरण तापलं, जोरदार घोषणाबाजी
आंदोलक आक्रमक
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 28, 2026 | 7:06 PM

नाशिकमधून मोठी बातमी समोर येत आहे.  आश्रमशाळा आणि वसतिगृहांमधील असुविधांविरोधात गेल्या दोन आठवड्यांपासून नाशिकमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोल सुरू आहे. या आंदोलनाची दखल घेऊन शुक्रवारी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी आंदोलक चांगेलच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे विद्यार्थ्यांशी चर्चा करून या प्रश्नावर तोडगा काढण्यात आदिवासी विकास मंत्र्यांना अपयश आलं आहे. अशोक उईके आणि आंदोलकांमधील चर्चा फिस्कटली आहे.

आश्रमशाळा आणि वसतिगृहांमधील असुविधांविरोधात गेल्या दोन आठवड्यांपासून विद्यार्थ्यांचं हे आंदोलन सुरू आहे. आज आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. तब्बल दीड तास चर्चा सुरू होती. मात्र मंत्र्यांसोबत दीड तास चर्चा करूनही  आंदोलकांचे समाधान न झाल्याने वातावरण चांगलेच तापले. आंदोलक विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाले.

‘आंदोलन मागे घेण्याची विनंती करण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या मृत्यूची नैतिक जबाबदारी घ्या’ अशी थेट मागणीच यावेळी आंदोलकांनी केली. उईके यांच्यासमोरच ‘आताच राजीनामा द्या’ अशा घोषणा देखील यावेळी आंदोलकांच्या वतीने देण्यात आल्या.  ‘आदिवासी मंत्री चोर आहे’, ‘आदिवासी मंत्री मुर्दाबाद’ अशा घोषणा देखील यावेळी विद्यार्थ्यांनी दिल्या.  घोषणाबाजी वाढल्यानंतर मंत्री डॉ. अशोक उईके यांनी शेवटी आंदोलनस्थळावरून काढता पाय घेतला
पोलिसांच्या बंदोबस्तात डॉ. अशोक उईके आंदोलनस्थळाबाहेर पडले. चर्चेत तोडगा न निघाल्याने आदिवासी विद्यार्थी संघटनांचे आंदोलन सुरूच आहे. यावर आता काय तोडगा निघणार? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान दुसरीकडे अमरावती जिल्ह्यातील शेकडो आदिवासी विद्यार्थ्यांनी मंत्री अशोक उईके यांच्या यवतमाळ येथील घराच्या दिशेनं लाँग मार्चला सुरुवात केली आहे. आज या लाँग मार्चचा दुसरा दिवस आहे. आतापर्यंत या विद्यार्थ्यांनी 45 किलोमीटरच अंतर पार केलं आहे. या आंदोलनाला खासदार बळवंत वानखडे यांनी देखील पाठिंबा दिला आहे. विद्यार्थ्यांचे वस्तीगृह, महाडीबीटी शिष्यवृत्ती योजना यासह विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी हा मोर्चा काढला आहे.

 

 

Follow Us