Gunratna Sadawarte : जरांगे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा माणूस, गुणरत्न सदावर्तेंचा गंभीर आरोप
मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील हे आंदोलनावर ठाम असून उद्या २९ ऑगस्ट पासून आंतरवाली सराटीत ते उपोषण सुरु करणार आहेत. त्यावर आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगेचे आंदोलन राजकीय असून मुख्यमंत्री आणि महसुल मंत्री मराठा नसल्याने त्यानी आंदोलन सुरु केल्याचा आरोप केला आहे.

मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी उद्या २९ ऑगस्ट पासून आंतरवलीत उपोषण सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आपल्या मागण्या पूर्ण न झाल्यास आपण मुंबईला धडकणार असेही आव्हान मनोज जरांगे यांनी दिले आहे. आता यावर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. मनोज जरांगे यांना कोणीतरी फिड करत आहे त्यामुळे ते असे बोलत आहेत. महत्वाच्या व्यक्तींबद्दल जी भाषा वापरली जात आहे ते सर्व रेकॉर्ड केले जात आहे. जरांगे यांना तातडीने अटक करा अशीही मागणी सदावर्ते यांनी केली आहे. एकनाथ शिंदेसह मोठ्या नेत्यांचा जरांगे यांना छुपा पाठिंबा असल्याचा आरोपही सदावर्ते यांनी केला आहे.
जरांगे ज्या पद्धतीने बरळत आहेत. हे त्याला कुणी तरी फिड केलेले आहे असे वाटतंय. आंदोलन करण्याची मुभा सर्वांना आहे,पण संविधानाच्या अधीन राहून आंदोलन करावे लागते. जी भाषा वापरली जात आहे , महत्वांच्या व्यक्तीबद्दल भाषा वापरली जात आहे. हे अत्यंत गंभीर आहे सर्वकाही रेकॉर्डींग केले जात आहे असे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
गंगाधर काळकुटे यांनी अर्ज दिला आहे. त्या पत्रावर निर्णय करा असे आम्ही सांगितले आहे. मंत्रालयातील कोणाची वाट बघू नका. या धमक्यांना गांभीर्यानं घ्या अशी आमची मागणी आहे. हे आंदोलन राजकीय फायद्यासाठी होत आहे. मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री बिगर मराठा असल्याने हे आंदोलन होत आहे. मनोज जरांगेंना तातडीनं अटक करा अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.
राजकीय अभय असल्यानं ही भाषा…
जरांगे यांची भाषा देशद्रोही आहे. न्यायालयाचे निर्देश होते त्याचे पालन करा असं न्यायालयाने म्हटले होते. हे आंदोलन पुर्णपणे राजकीय आंदोलन आहे. एकनाथ शिंदेसह मोठ्या नेत्यांचा छुपा पाठिंबा असल्याचे दिसून येत आहे. राजकीय अभय असल्यानं ही भाषा वापरली जात आहे. उदय सामंत यांची बाँडी लँग्वेज सांगते. एकनाथ शिंदे नाही तर सत्तेतील मंत्री ,विखे पाटलांची भुमिका देखील चेक केली पाहिजे. हे जे चाललंय ते ठरवून चाललं आहे. या आंदोलनाविरोधात जे काही कायदेशीर मार्ग आहेत ते वापरू असेही गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे.
