पुण्यात डीजेविरोधी भूमिका मांडणाऱ्या विद्यानंद बापटांना कॅमेऱ्यासमोरच झापड; असीम सरोदे संतापले
पुण्यातील विद्यानंद बापट यांना टीव्ही ९ मराठीशी बोलताना एका तरुणाने झापड मारली. त्याप्रकरणी कायदेतज्ज्ञ असिम सरोदे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ते नेमकं काय म्हणाले, ते सविस्तर जाणून घ्या..

पुण्यातील विद्यानंद बापट यांच्यावर एका तरुणाने केलेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर या प्रकरणावर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. टीव्ही ९ मराठीशी बोलताना कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. वेगळं मत मांडणाऱ्या व्यक्तीला विरोध करण्याऐवजी त्याचं म्हणणं ऐकून घेण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं. असीम सरोदे यांच्या म्हणण्यानुसार, पुणे ही चांगुलपणाची प्रयोगशाळा म्हणून ओळखली जाते; मात्र दुर्दैवाने काही प्रवृत्तींमुळे हे शहर वाईटपणाचीही प्रयोगशाळा बनत असल्याचं चित्र दिसत आहे. समाजातील काही कट्टरवादी प्रवृत्ती वाढत असल्याचा आरोप करत त्यांनी विद्यानंद बापट यांच्यावर झालेला हल्ला हा त्याच मानसिकतेचा परिणाम असल्याचं मत व्यक्त केलं.
‘वेगळं मत मान्यच करायचं नाही, ही प्रवृत्ती धोकादायक’
विद्यानंद बापट हे समाजात जनजागृती करण्याचं काम करत असल्याचं सरोदे यांनी म्हटलं. एखाद्या व्यक्तीचं मत आपल्यापेक्षा वेगळं असल्यास त्याचा विरोध करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे; मात्र त्या व्यक्तीवर शारीरिक हल्ला करण्याचा अधिकार कोणालाही नाही. विचार पटत नसेल तर वैचारिक पद्धतीने उत्तर देणं गरजेचं आहे, असं त्यांनी सांगितलं. यावेळी सरोदे यांनी महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा दाखला दिला. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी समाजजागृतीचं काम करताना मोठ्या विरोधाचा सामना केला होता. त्यांच्या वाट्याला अपमान आणि त्रास आला. आजच्या काळात समाजासाठी प्रश्न उपस्थित करणाऱ्या व्यक्तींना सोशल मीडियावरील ट्रोलिंग, शिवीगाळ आणि आता प्रसंगी मारहाणीचाही सामना करावा लागत असल्याचं त्यांनी नमूद केलं.
ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत
विद्यानंद बापट यांनी हाती घेतलेला विषय मोठा असल्याचं सांगताना सरोदे यांनी महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील ध्वनी प्रदूषण कमी होण्याची गरज व्यक्त केली. सण-उत्सव साजरे करताना आनंदासोबतच इतर नागरिकांचा विचार करणं आणि संवेदनशील पद्धतीने उत्सव साजरा करणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. उत्सवांमधील ध्वनी प्रदूषण, मोठ्या आवाजातील संगीत आणि त्याचा नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम हा अनेकदा चर्चेचा विषय ठरतो. या पार्श्वभूमीवर नियमांचं पालन करत उत्सव साजरे करण्याबाबत जनजागृती करणं महत्त्वाचं असल्याचं सरोदे यांच्या प्रतिक्रियेतून स्पष्ट होतं.
‘पोलिसांनी बापट यांना संरक्षण द्यावं’
विद्यानंद बापट यांच्याशी आपलं बोलणं झालं असून ते सुखरूप असल्याचं असीम सरोदे यांनी सांगितलं. मात्र, अशा घटनांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. बापट यांना पोलिसांनी संरक्षण द्यावं आणि हल्ला करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली. मतस्वातंत्र्य आणि विचारस्वातंत्र्य दडपण्यासाठी हिंसेचा वापर करण्याची मानसिकता समाजासाठी धोकादायक असल्याचं सरोदे यांनी म्हटलं. एखाद्या विचाराशी असहमती असेल तर संवाद आणि कायदेशीर मार्गाचा अवलंब केला पाहिजे. व्यक्तीवर हल्ला करून तिचा आवाज दाबण्याचा प्रयत्न लोकशाही मूल्यांसाठी गंभीर बाब असल्याचं या घटनेच्या निमित्ताने पुन्हा अधोरेखित झालं आहे.