मानसिक छळाला वैतागून पोलीस पाटील महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न, गावात दंगल, आरोपीविरोधात गावकरी आक्रमक

| Updated on: Dec 13, 2020 | 5:08 PM

औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातल्या केळगाव या गावातील पोलीस पाटील महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर गावात दंगल उसळली (Aurangabad Police Patil Woman attempt to Suicide)

मानसिक छळाला वैतागून पोलीस पाटील महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न, गावात दंगल, आरोपीविरोधात गावकरी आक्रमक
Follow us on

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातल्या केळगाव या गावातील पोलीस पाटील महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर गावात दंगल उसळली. गावातील पोलीस पाटील महिलेला गावातीलच एक व्यक्ती अश्लील भाषेत शिवीगाळ करायचा, महिलेला वारंवार मानसिक त्रास देत होता. या त्रासाला कंटाळून पोलीस पाटील महिलेने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला (Aurangabad Police Patil Woman attempt to Suicide).

आत्महत्या करण्यापूर्वी या महिलेने एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल केला. या व्हिडीओची जिल्हाभर जोरदार चर्चा झाली. या व्हिडिओची पोलिसांनी गंभीर दखल घेऊन गुन्हा दाखल करणं अपेक्षित होतं, असं जमावाचं म्हणणं होतं. महिलेने विष प्राशन केल्यानंतर या महिलेला सिल्लोड इथल्या एका खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं. महिलेने विष प्राशन केल्यानंतर संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला पोलिसांनी अटकही केली. मात्र त्यानंतर कोर्टाने या व्यक्तीला जामीन दिला.

जामीन दिल्यानंतर पोलीस त्या व्यक्तीला सोडण्यासाठी गावात गेले. आरोपी गावत आल्यानंतर गावकऱ्यांनी या आरोपीला सोडलंच कसं? असा सवाल करत त्याच्यावर हल्ला केला. गावकऱ्यांनी आरोपीच्या घरावरही हल्ला केला. रात्री आठ वाजेच्या सुमारास हा सगळा प्रकार सुरू झाला त्यावेळेला जमाव खूप आक्रमक बनला होता. त्यामुळे पोलिसांना हवेत फायरिंग करावी लागली. पोलिसांनी त्यावेळी अश्रुधुराच्या नळकांड्यासुद्धा फोडल्या.

साधारण दोनशे ते अडीचशे लोक एकत्र येत त्या गावात घरावरती हल्ला करत होते. दरम्यानच्या काळात पोलिसांनाही जमावाने मोठ्या प्रमाणात धक्काबुक्की केली. या धक्काबुक्कीत एक पोलीस अधिकारी आणि तीन कर्मचारी जखमी झाले (Aurangabad Police Patil Woman attempt to Suicide).

सध्या विष प्राशन केलेल्या पोलीस पाटील महिलेवर उपचार सुरू आहेत. मात्र महिलेची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला पुन्हा एकदा अटक करावी. त्याच्याविरोधात कारवाई करावी, अशी मागणी गावकरी करत आहेत. गावकऱ्यांच्या मागणीचा पोलिसांकडून सध्या विचार केला जातोय. मात्र आरोपीला कोर्टाने जर जामीन दिला असेल तर त्या आरोपीला पुन्हा अटक कशी करायची? असा प्रश्न पोलिसांसमोर उभा राहिलेला आहे.

हेही वाचा : डॉ. शीतल आमटेंच्या श्रद्धांजली सभेला आमटे कुटुंबीय गैरहजर